जालना : हुड्यांसाठी सासरकडून होणार्या छळास कंटाळून 19 वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना नारायणगाव (कासारवाडी अंबड) येथे घडली. स्वाती उर्फ सरस्वती शरद मैंद, असे मृत विवाहितेचे नाव आहे.
या संदर्भात दत्तू आश्रुबा तोतरे (वय 60) रा. रेवगाव जालना यांनी अंबड पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार त्यांची मुलगी स्वाती हिचा विवाह वर्षभरापूर्वी नारायणगाव येथील शरद चंदू मैंद याच्याशी झाला. विवाहानंतर सासरकडील नातेवाईकांनी शेती घेण्यासाठी 15 लाख रुपये व एक तोळ्याची सोन्याची चेन असलेल्या माहेरहून घेऊन ये, असा तगादा लावून मुलीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच ‘ तु पसंद नाहीस ‘ म्हणत तिला वारंवार मारहाण केली.
सासरकडून होणार्या छळास कंटाळून आपली मुलगी स्वाती हिने दि 3 रोजी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमुद आहे. त्यानुसार पती शरद मैंद, सासरा चंदू मैंद,भाया भरत मैंद व दीर विष्णू मैंद यांच्यासह सासू व जावा विरुद्ध आत्महतेस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक इंगळे आधिक तपास करत आहेत.