गडकिल्ले संवर्धनासाठी आता दुर्ग प्राधिकरण स्थापन करणार : एकनाथ शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह राज्यातील अनेकांनी छ. शिवाजी महाराज यांचे गडकोट, इतिहास किल्ले जतन करण्याची मागणी केली आहे. गडाचे पावित्र्य, साैंदर्य जपण्यासाठी व संवर्धन करण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे राज्यातील गडकिल्ले यांचे संवर्धन करण्यासाठी दुर्ग प्राधिकारण स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रतापगडावर केली.

किल्ले प्रतापगड (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथे 363 वा शिवप्रताप दिनाच्या उत्सावात ते मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, खा. श्रीनिवास पाटील, खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर, आ. मकरंद पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. महेश शिंदे, आ. महादेव जानकर, आ. भरत गोगावले, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गडकिल्ले संवर्धन करण्याची जबाबदारी ही आता दुर्ग प्राधिकरणाची राहील. मुंबईत काही शिवभक्त मला आझाद मैदानावर भेटले. त्यांनी गडकिल्ल्यांचे संवर्धन, जतन करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. परंतु ही सर्व जबाबदारी शासनाची आहे. त्यामुळे गडकिल्ल्यांसाठी कुठेही निधी कमी पडणार नाही. प्रतापगड येथे ज्या प्रकारे अतिक्रमण हटविण्यात आले. त्याचप्रमाणे सर्व गडकोटवरील अतिक्रमण हटविण्यात येईल.