नवी दिल्ली । सरकारच्या गुंतवणूक योजनांमध्ये कमी जोखमीच्या गुंतवणुकीसाठी असे अनेक पर्याय आहेत, ज्यामध्ये खूप चांगला रिटर्न आणि गॅरेंटी आहे. जर तुम्ही देखील कमी जोखमीच्या गुंतवणुकीचे पर्याय शोधत असाल तर ही पोस्ट ऑफिस योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. भारतीय पोस्टची ग्राम सुरक्षा योजना हा असाच एक गुंतवणुकीचा पर्याय आहे ज्यामध्ये तुम्हाला कमी जोखमीसह चांगला रिटर्न मिळू शकतो. याद्वारे गॅरेंटेड रिटर्न मिळते.
अशा प्रकारे आहेत नियम आणि अटी
19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक ही विमा योजना घेऊ शकतो. या योजनेअंतर्गत विम्याची कमीत कमी रक्कम 10,000 रुपये तर जास्तीत जास्त 10 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येईल. या योजनेचा प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर भरला जाऊ शकतो. यामध्ये ग्राहकांना प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी देखील दिला जातो. पॉलिसी टर्म दरम्यान डिफॉल्ट झाल्यास, बिलेटेड प्रीमियम भरून ग्राहक पॉलिसी पुन्हा सुरु करता येते.
असे आहेत ‘या’ योजनेचे फायदे
जर एखाद्याने 19 वर्षांच्या वयात 10 लाख रुपयांची ग्राम सुरक्षा पॉलिसी घेतली तर 55 वर्षांसाठी मासिक प्रीमियम 1,515 रुपये, 58 वर्षांसाठी 1,463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1,411 रुपये असेल. पॉलिसी खरेदीदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये मॅच्युरिटी बेनिफिट मिळेल. 60 वर्षांसाठी मॅच्युरिटी बेनिफिट 34.60 लाख रुपये असेल.
संपूर्ण माहिती येथे मिळेल
पॉलिसीधारकाच्या नावातील कोणत्याही अपडेटसाठी किंवा ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर सारख्या इतर डिटेल्ससाठी जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकता. इतर माहितीसाठी, ग्राहक टोल-फ्री हेल्पलाइन 1800 180 5232/155232 किंवा अधिकृत वेबसाइट www.postallifeinsurance.gov.in वर संपर्क साधू शकतात.
कर्ज देखील मिळेल
ही विमा योजना कर्ज सुविधेसह येते. म्हणजेच यावर तुम्हाला कर्जही मिळू शकते. मात्र पॉलिसी खरेदीच्या चार वर्षानंतरच त्याचा लाभ मिळू शकतो. ग्राहक 3 वर्षानंतर पॉलिसी सरेंडर करणे निवडू शकतो. म्हणजेच त्याचा लॉक-इन पिरियड 3 वर्षांचा आहे. मात्र अशावेळी तुम्हाला त्याचा कोणताही फायदा मिळणार नाही. पॉलिसीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इंडिया पोस्टने ऑफर केलेला बोनस. शेवटचा जाहीर केलेला बोनस 65 रुपये प्रति 1,000 प्रति वर्ष दिला गेला.