मला मोदी आणि केंद्राचा आशीर्वाद पाहिजे; केजरीवालांच्या विधानाने चर्चाना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने भाजप आणि काँग्रेसचा पराभव करत बाजी मारली. दिल्लीत प्रथमच ‘आप’चा महापौर होणार आहे. या विजयांनंतर आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांचे आभार मानताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. मला मोदी आणि केंद्राचा आशीर्वाद पाहिजे असं केजरीवाल म्हणाले.

आप’च्या विजयानंतर जनतेला संभोधित करताना केजरीवाल म्हणाले, मला वीज आणि पाण्याची जबाबदारी दिली आहे, ती आम्ही निश्चित केली आहे. आता महापालिकेची जबाबदारी देण्यात आली आहे, आम्ही रात्रंदिवस काम करू, महापालिका सुरळीत करू, कचऱ्याची समस्या दूर करू, भ्रष्टाचार दूर करू. हे करण्यासाठी आम्हाला सर्वांच्या सहकार्याची गरज आहे, विशेषत: केंद्र आणि पंतप्रधानांची मदत आणि आशीर्वाद हवेत असं केजरीवाल म्हणाले.

दरम्यान, दिल्ली महानगरपालिका निवडणुकीतील सर्व 250 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, आम आदमी पक्षाला 134, भाजप 104 आणि काँग्रेसला 9 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत तीन अपक्ष उमेदवारही विजयी झाले. आपच्या या विजयामुळे एमसीडीमधील भाजपची 15 वर्षांची सत्ताही संपुष्टात आली आहे.