शिवरायांची जगदंबा तलवार महाराष्ट्रात येणार? सरकारकडून हालचाली सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात परत आणण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. याबाबतची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिली आहे. केंद्र सरकारमार्फत ब्रिटन सरकारकडे यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर आता केंद्र सरकारच्या माध्यमातून जगदंब तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. २०२४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतिनशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त राज्य शासनाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचा आराखडा करण्यात येत आहे. २०२४ पर्यंत जगदंबा तलवार भारतात परत आली तर आमचा आनंद द्विगुणित होईल.

दरम्यान, आज शिवप्रताप दिन असून सकाळीच प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबरी शेजारील उदात्तीकरण हटवण्याची कारवाई राज्य सरकार कडून करण्यात आली होती. अफजल खान आणि सय्यद बंडा यांच्या कबरी भोवती असणारे सर्व अनाधिकृत बांधकाम आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने हजारो पोलिसांच्या फौज फाट्याच्या बंदोबस्तात अत्याधुनिक मशनरीने जमीनदोस्त केले. यावेळी प्रतापगडाच्या पायथ्याला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.