सिसोदिया यांच्या अटकेवरून केजरीवालांनी मोदींना घेरले, म्हणाले की….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरणी सीबीआयने अटक केल्यांनतर आपचे संस्थापक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. मोदी हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारखा अतिरेक करत आहेत असं त्यांनी म्हंटल. तसेच मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांची सुटका होईल असा टोलाही अरविंद केजरीवाल यांनी लगावला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना केजरीवाल म्हणाले, दारू धोरणात कोणताही घोटाळा झालेला नाही. दिल्लीत सुरू असलेली चांगली कामे थांबली पाहिजेत, अशी पंतप्रधानांची इच्छा आहे. त्यांना फक्त ‘आप’ला रोखायचे आहे, आम्ही पंजाबमध्ये जिंकलो हे त्यांना सहन होणार नाही. ‘आप’ हे वादळ आहे, ज्याला ते थांबवू शकत नाहीत असं म्हणत केजरीवाल यांनी मोदींवर निशाणा साधला. मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांची निर्दोष सुटका होईल असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

सीबीआय आणि ईडीकडून विरोधकांना त्रास दिला जात आहे. आमच्या मंत्र्यांना खोट्या प्रकरणात अटक करून त्यांना दिल्लीची कामे बंद पाडायची आहेत. पण मी तुम्हाला ग्वाही देतो कि दिल्लीची कामे अजिबात थांबणार नाहीत असं यावेळी केजरीवाल यांनी म्हंटल. आम्ही आता घरोघरी प्रचार करणार, प्रत्येक व्यक्तीशी बोलणार आणि मोदी हे इंदिरा गांधी यांच्यासारखा कसा अतिरेक करत आहेत हे सुद्धा जनतेला सांगू असं म्हणत केजरीवाल यांनी मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला.