हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Local Train । मुंबई लोकलची गर्दी म्हणजे रोजचंच मड त्याला कोण रडं अशी परिस्थिती…. लोकलमधून प्रवास करणं म्हणजे आजकाल तारेवरची कसरत झाली आहे. त्यातच मागच्या आठवड्यात मुंब्रा येथील लोकल ट्रेन मधून काही प्रवासी खाली पडल्याने मुंबईच्या या लाईफलाईन वर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. परंतु आता लवकरच मुंबई लोकल ट्रेन मधील गर्दीचा प्रश्न मिटणार आहे. होय, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तशी घोषणाच तर केलीय. येत्या ३ वर्षांत मुंबई लोकलच्या फेऱ्या दुप्पट करणार असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी म्हंटल आहे. रेल्वेमंत्र्यांच्या या घोषणेमुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्याची शक्यता आहे.
टप्याटप्याने 300 अतिरिक्त लोकल ट्रेन सोडल्या जातील – Mumbai Local Train
एका खाजगी वृत्तपत्राशी संवाद साधताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) म्हणाले की, महाराष्ट्रासाठी रेल्वे विभागाने यंदा ८१ हजार कोटींची तरतूद केली आहे. यात एकट्या मुंबई व एमएमआरमध्ये सध्या १६ हजार कोटींची कामे सुरू आहेत. तर मुंबईती सर्व लोकल ट्रेनना स्वयंचलित दरवाजे बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये स्वयंचलित दरवाजे असलेल्या पहिल्या लोकलची चाचणी घेतली जाईल. मुंबईत सध्याच्या सुमारास एकूण 3200 फेऱ्या दररोज होतात. त्या फेऱ्या आणखी वाढवण्याच्या हेतूने काम सुरू आहे. टप्याटप्याने सुमारे 300 अतिरिक्त लोकल ट्रेन सोडल्या जातील . सर्वच लोकल एसी करण्याचा विचार राजकीय विरोधामुळे बाजूला ठेवावा लागला असला, तरी जास्तीत जास्त गाड्या वातानुकूलित करण्याचा निर्णय झाला आहे असेही अश्विनी वैष्णव यांनी म्हंटल.
अश्विनी वैष्णव पुढे म्हणाले, मुंबईत सध्या तीन मिनिटांच्या अंतराने दोन लोकल धावतात. या दोन्ही लोकलमधील (Mumbai Local Train) अंतर कमी करण्यात येईल. दोन लोकलमधील अंतर हे चार मिनिटांवरुन अडीच मिनिटांवर आणण्यासाठी आम्ही नवीन तंत्रज्ञान विकसित करणार आहोत, असं तंत्रज्ञान विकसित करणारे मुंबई हे भारतातील पाहिलेच शहर ठरेल. तिन्ही मार्गावरील लोकल ट्रेन्सना कवच प्रणालीबरोबर कम्बाइन कम्युनिकेशन्स बेस्ड कंट्रोल ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) यंत्रणेशी जोडण्यात येईल. सीबीटीसी प्रणालीमुळे येत्या तीन वर्षांत लोकल फेऱ्यांची संख्या दुप्पट होईल. त्याचबरोबर ३५० नवीन एसी लोकल सुरू करणार आहोत अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.




