ठाकरेंनी भाजपचं मंगळसूत्र घातलं आणि मुख्यमंत्री पदासाठी पवारांचा हात पकडून गेले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
उद्धव ठाकरे भाजपसोबत नांदत होते, त्यांनी भाजपचे मंगलसूत्र घातले होते, आणि निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांचा हात पकडून गेले असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार टोला लगावला आहे. नारायण राणे सातारा दौऱ्यावर असून आज त्यांनी छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेतलं.

उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊन मूर्खपणा केला आहे, त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये २०१९ मध्ये ते भाजपसोबत नांदत होते, त्यांनी भाजपचे मंगलसूत्र घातले होते, आणि एकत्र निवडणुका सुद्धा लढल्या होत्या. पण निवडणुकीनंतर ते मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांचा हात पकडून गेले. हि काय नैतिकता आहे का? त्यामुळे नैतिकता नसलेल्या माणसाने बोलू नये. घरात गप्प बसा अशी टीका नारायण राणे यांनी केली.

यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. संजय राऊत सध्या बेकार आहे, त्यांची एकही भाकिते खरी होत नाहीत. सध्या संजय राऊत डिप्रेशन मध्ये गेलेला आहे. संजय राऊतांनी शिवसेनेला संपवलं आहे अशा शब्दात नारायण राणे यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे.