नवी दिल्ली । सीमावादावरून भारत आणि नेपाळ दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. अशा परिस्थितीतच बिहारमधील भारत-नेपाळ सीमेवर नेपाळ सशस्त्र दलाकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यामध्ये शेतात काम करणाऱ्या एका भारतीयाचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. भारत नेपाळ सीमेवर असलेल्या बिहारमधील सीतामढी या गावात नेपाळकडून हा गोळीबार करण्यात आला.
ही घटना नारायणपूर आणि लालबन्दी सीमा भागात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सीतामढीमधील पिपरा परसाईन पंचायतीच्या जानकी नगर सीमेवर काही जण शेतात काम करत होते. त्याचवेळी नेपाळच्या दिशेहून अंधाधुंद गोळीबार सुरू करण्यात आला. यादरम्यान एका भारतीयाचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले. दरम्यान, दोघांना उपचारासाठी सीतामढीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच घटनास्थळी स्थानिक जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि काही वरिष्ठ अधिकारीही रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर सीमेवर तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
Bihar: One dead, two injured in firing in Sitamarhi near India-Nepal border, confirms Sashastra Seema Bal IG of Bihar sector. Locals allege it was caused due to firing from Nepal side. pic.twitter.com/zr5YaJN9YE
— ANI (@ANI) June 12, 2020
भारत-नेपाळ सीमेवर तणावाचं कारण काय?
गेल्या काही दिवसांपूर्वी नेपाळने लिपूलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा या भारतीय प्रदेशांवर दावा केला आहे. नेपाळने नवीन नकाशा जारी केला असून त्यात लिपूलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा हे भारतीय प्रदेश नेपाळमध्ये दाखवले आहेत. नकाशामधील या बदलांना नेपाळच्या संसदेची मान्यता आवश्यकता आहे. त्यासाठी नेपाळच्या संविधानामध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे. “नेपाळच्या नकाशामध्ये बदल करण्याला सर्वपक्षांनी पाठिंबा दिला आहे. हा बदल कायम राहणार आहे” असं नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ग्यावाली यांनी म्हटलं होतं. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला होता. दरम्यान, लिपूलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा हे भाग भारताचा भाग असल्याचे भारतानं स्पष्ट करण्यात आलं आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in




