सातारा जिल्ह्याधिकाऱ्यांच्या बदलीमागे ‘या’ बड्या नेत्याचा हात?, पंजाबराव पाटील यांचा आंदोलनाचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची यांची नुकतीच तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. माहिती काढल्यानंतर असे समजले की अशी चर्चा होत आहे की, जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांचे जमत नव्हते. प्रशासनाने केलेली जिल्हाधिकारी जयवंशी यांची बदली तात्काळ रद्द करावी, अन्यथा सोमवारी तीव्र आंदोलन करू, अशा इशारा बळीराजा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिला.

जिल्हाधिकारी जयवंशी यांच्या तडकाफडकी बदलीमुळे बळीराजा संघटना आक्रमक झाली आहे. याबाबत पंजाबराव पाटील म्हणाले की, राज्य सरकारने देखील त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापुर्वीच बदली केली. बळीराजा संघटनेच्या माध्यमातून आम्ही गेल्या सहा महिन्यांमध्ये शेतकऱ्यांचे ऊस दरासह अनेक प्रश्न त्यांच्यापुढे मांडले ते त्यांनी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न केला. साखर कारखाने सुरू होण्यापूर्वी मागील हंगामात जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखाना व जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घेतली होती. त्यावेळी ऊसदराबाबत योग्य तोडगा काढून 2400 रुपयांवरून 3 हजार रुपये प्रतिटन दर देण्याचे काम त्यांच्या पुढाकारामुळे झाले.

शेतकऱ्यांप्रती तळमळ असलेल्या अशा चांगल्या अधिकाऱ्याची अचानक बदली होणे याच्या पाठीमागे राजकारण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी व संघटनांनी या बदलीच्या विरोधात तीव्र आवाज उठवावा. या बदलीचा बळीराजा शेतकरी संघटना तीव्र निषेध करत आहे. राज्य सरकारने जिल्हाधिकारी जयवंशी यांची बदली तत्काळ रद्द करावी,अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बरोबर घेऊन सोमवार, दि. १२ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करेल, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.