पुण्यात सत्तासंघर्षावर बॅनरबाजी; सरन्यायाधीशांचा फोटो अन् खाली भलामोठा मजकूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी तब्बल ९ महिन्यांनी पूर्ण झाली असून लवकरच याबाबत निकाल जाहीर करण्यात येईल. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांचे खंडपीठ हा निकाल जाहीर करेल. तत्पूर्वीच पुण्यात या सत्तासंघर्षांबाबत बॅनरबाजी पहायला मिळाली. युवक राष्ट्रवादी काँग्रेसने हा बॅनर बनवला आहे. यामध्ये चंद्रचूड यांच्या फोटोखाली काही मजकूर लिहिण्यात आला आहे. लोकशाही वाचवण्यासाठी योग्य तो निर्णय द्यावा असं आवाहन राष्ट्रवादीने या बॅनरच्या माध्यमातून केलं आहे.

बॅनरमध्ये नेमकं काय म्हंटल आहे?

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपला भारत देश ओळखला जातो. आपण सर्व जाती धर्मातील लोक हे गर्वाने सांगतो. परंतु अलीकडच्या काळात सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा केलेला गैरवापर आदी गोष्टींमुळे आपल्या देशात खरच लोकशाही उरली का? असा देशील प्रश्न पडतो. दिवसा ढवळ्या लोकशाही गाडून टाकण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या जनतेने उघड डोळ्यांनी पाहिले आहे. सत्ताधारी दडपशाहीने अधिकारांचा गैरवापर करुन हुकूमशाहीला पूरक असे वातावरण करत आहेत.

अशा परिस्थितीत तमाम भारतातील जनता आपल्याकडे न्यायाची आस लावून बसली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा लढा लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अंत्यत महत्वाचा आहे. आपण लोकशाही वाचवण्यासाठी योग्य तो निर्णय द्याल, याची खात्री आहे. अन्यथा भारतातील हुकूमशाहीची ही सुरुवात असेल, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही असं म्हणत या बॅनरच्या माध्यमातून सरन्यायाधीश चंद्रचूड यांना आवाहन करण्यात आलं आहे.