राहुल कुल यांच्यावर 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप; संजय राऊतांचे फडणवीसांना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीची कारवाई सुरु असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदारावरच तब्बल ५०० कोटीच्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कागदपत्रे दिली आहेत. या संपूर्ण प्रकरणाची निःपक्ष चौकशी व्हावी अशी मागणी संजय राऊत यांनी फडणवीसांकडे केली आहे. त्यामुळे राहुल कुल अडचणीत येण्याची शक्यता आहे.

मा. देवेंद्र जी, भीमा सहकारी साखर कारखान्याचे प्रकरण आपल्याकडे पाठवीत आहे. शेतकरी लुटला गेलाय हे स्पष्ट दिसते. 500 कोटीचा money laundring व्यवहार आहे. निःपक्ष चौकशीची आपल्या कडून अपेक्षा आहे असे ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. यासोबतच त्यांनी कागदपत्रेही जोडली आहेत. तसेच भीमा कोरेगाव साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची यादी संजय राऊत यांनी ट्विट केली आहे. Pmla कायद्याने कारवाई व्हावी असे घोटाळे संचालक मंडळाने केलें आहेत व राजकीय वरदहस्त लाभला असल्याने ते बिनधास्त आहेत. शेतकऱ्यांच्या फसवणकीस सरकारी पाठींबा आहे का? असा थेट सवाल त्यांनी यावेळी केला आहे.

काय आहे राऊतांच्या पत्रात –

आपल्या नेतृत्वाखालील सरकारने सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार खणून काढण्याचे ठरवले आहे व त्याबद्दल आपले अभिनंदन. भारतीय जनता पक्षाचे काही नेते जे आपल्या अंतस्थ गोटात वावरत असतात, ते सातत्याने प्रमुख विरोधी पक्षांचे व्यवहार, त्यांचे साखर कारखाने याबाबत भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आणत आहेत व या नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिराही लावला जातो. भ्रष्टाचारास धर्म व राजकीय पक्ष नसतो. त्यामुळे भ्रष्टाचाराची वाळवी नष्ट होणे गरजेचे आहे, या मताचा मी आहे.

पुणे जिल्ह्यातील तालुका दौंड येथील भीमा सहकारी साखर कारखाना लि. ने गेल्या काही वर्षांत केलेल्या भ्रष्टाचार – गैरव्यवहाराचे प्रकरण म्हणजे सरळ सरळ अंदाजे ५०० कोटी रुपयांचे ‘मनी लाँडरिंग’ आहे. कोल्हापुरातील आमदार हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे व तपास यंत्रणांच्या धाडी त्या संदर्भात पडत आहेत. पण दौडच्या भीमा सहकारी साखर कारखान्यातील शेकडो कोटींचा गैरव्यवहार यापेक्षा भयंकर आहे व या भ्रष्टाचारास राजकीय संरक्षण मिळत असेल तर ते गंभीर आहे.

भाजपच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचे मुख्य सुत्रधार श्री. किरीट सोमय्या यांच्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत आपण भीमा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची माहिती घेऊ शकता. त्यांच्या कार्यालयात हे प्रकरण संबंधित तक्रारदार घेऊन गेले आहेत. पण किरीट सोमय्या त्या भ्रष्टाचारावर मूग गिळून बसलेत. जनतेच्या पैशांची प्रचंड लुटमार या कारखान्यात झाली आहे. हे सर्व प्रकरण तत्काळ ‘ईडी’ व ‘सीबीआय’च्या ताब्यात देऊन भीमा सहकारी साखर कारखान्यात घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई करावी. या प्रकरणाचा सविस्तर तपशील सोबत जोडत आहे असं संजय राऊत यांनी म्हंटल.