2 आठवडे झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार का नाही? महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा : संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटींच्या घरात असून केवळ केवळ 2 सदस्यांचे मंत्रिमंडळ आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी. तसेच शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेले निर्णयही अवैध असल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे.

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, बार्बाडोसची लोकसंख्या 2.5 लाख आहे आणि तरीही त्यांच्या मंत्रिमंडळात 27 सदस्य आहेत. महाराष्ट्राच्या 12 कोटी लोकसंख्येमध्ये 2 सदस्यांचे मंत्रिमंडळ आहे जे मनमानी निर्णय घेत आहे. कुठे आहे संविधानाचा आदर? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असे ट्विट राऊतांनी केले आहे.

तसेच त्यांनी आणखी एक ट्विट केले असून त्यामध्ये “भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 1A नुसार राज्याचे मंत्रीमंडळ किमान 12 मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येचा मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. गेले 2 आठवडे महाराष्ट्रात 2 मंत्र्यांचे मंत्रीमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही. राज्यपाल, हे काय सुरू आहे ? असा सवाल राऊतांनी विचारला आहे.

Leave a Comment