फडणवीस- शिंदे महाराष्ट्राला लाभलेले नवे हरून- अल रशीद; संजय राऊतांची बोचरी टीका

0
69
Sanjay Raut Devendra Fadnavis Eknath shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी ननंतर भाजपने आपला यात काहीही संबंध नाही अस म्हणत हात वर केले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक मोठा खुलासा करत फडणवीस रात्रीचे वेष बदलून शिंदेंना भेटायचे अस सांगितले होते. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. अमृता फडणवीस यांनी हे रहस्य फोडले नसते तर या महान कलावंताची महाराष्ट्राला ओळखच झाली नसती असा टोला संजय राऊत यांनी फडणवीसांना लगावला.

एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह जे बंड केले, त्याच्याशी भाजपचा संबंध नाही असे सांगणारे भाजपवाले उघडे पडले. श्री. शिंदे यांनीच पडद्यामागचे सारे कारस्थान विधानसभेत फोडले व आता सौ. अमृता फडणवीस यांनीच घरातले गुपित फोडले. “या सर्व काळात देवेंद्र फडणवीस हे रात्री-अपरात्री वेषांतर करून शिंदे यांना भेटण्यासाठी बाहेर पडत. “काळा कोट, काळा चष्मा, फेल्ट हॅट असे जेम्स बॉण्ड किंवा शेरलॉक होम्स पद्धतीचे वेषांतर करून ते बाहेर पडत असावेत. त्यांच्या तोंडात चिरूट वगैरे आणि हातात नक्षीदार काठी होती काय? याचाही खुलासा व्हायला हवा असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

पंतप्रधान मोदी हे कपड्यांचे व रूप पालटून फिरण्याचे शौकीन आहेत, पण फडणवीसही तेच करू लागले. त्यांनी शिंदे यांना भेटायला जाताना काही वेळेस नकली दाढी-मिश्याही लावल्या असाव्यात. हे सर्व रहस्य त्यांच्या पत्नी सी. अमृता यांनी फोडले नसते तर या महान कलावंताची महाराष्ट्राला ओळखच झाली नसती. फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सत्तांतर घडवून आणण्यासाठी जे विषांतर केले ते सर्व कपडे व ऐवज पुढील पिढीसाठी एखाद्या संग्रहालयातच ठेवले पाहिजेत.

बगदादचा खलिफा हरुन अल-रशीद अनेकदा वेषांतर करून त्याच्या राज्यात रात्रीचा फिरत असे, पण तो का फिरत असे? आपल्या राज्याचे प्रशासन, सरदार प्रजेशी नीट वागत आहेत ना? प्रजेला काय समस्या आहेत? आपले राज्य नीट चालले आहे ना? राज्यकारभार करताना आपल्याला कोणी फसवत तर नाही ना? हे जाणून घेण्यासाठी; पण नागपूरचे व ठाण्याचे हरून अल-रशीद वेषांतर करून भेटत होते ते बाळासाहेब ठाकरे याची शिवसेना फोडण्याचे कारस्थान तडीस नेण्यासाठी. हरुन-अल- रशीद हा उत्तम खलिफा, पण बगदादला जसा चांगला राजा होता तसा चोर व लुटारूंचा सुळसुळाट होता. ‘थीफ ऑफ बगदाद’ किंवा ‘अलिबाबा चाळीस चोर’ या सर्व कथा आणि कृनुकथा बगदादशी संबंधित आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला लाभलेले नवे हरून- अल रशीद नक्की काय करणार? असा सवाल करत संजय राऊतांनी शिंदे- फडणवीस यांच्या वर जोरदार टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here