उस्मानाबाद | कळंब तालुक्यातील मोहा येथे एका शेतात तब्बल सव्वा कोटीच्या गांजाचा साठा सापडला. याची माहिती मिळताच पोलिसांनी कळंब तालुक्यातील मोहा येथे सापळा रचून अटक केली. शेतामध्ये सव्वा कोटी रुपये किमतीचा गांजा साठवूनक केल्या प्रकरणी आरोपीस गुरुवारी उस्मानाबाद येथील न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
काही दिवसापूर्वीच कळंब तालुक्यातील मस्सा शिवारामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करून शेतात लपवून ठेवलेला सव्वा कोटीचा गांजा जप्त केला होता. 31 मे रोजी सायंकाळी पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून ताडपत्री झाकून ठेवलेले 47 बॅग्स गांजा जप्त केला. या प्रकरणी बालाजी काळे आणि राजेंद्र काळे यांच्या विरुद्ध कळम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. परंतु आरोपी फरार होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी राजेंद्र काळे हा आपल्या बहिणीला भेटण्यासाठी मोहा या ठिकाणी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली.
पोलिस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल पाटील, पोना पवार, बाळासाहेब तांबडे, गणेश वाघमोडे यांनी बुधवारी दिनांक 9 रोजी रात्री राजेंद्र काळे यास पोलिसांनी मोहा शिवारात येत असताना अटक केली.