जिल्ह्यातील सहा लाख नागरिक लसवंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी आटोक्यात आल्याची चिन्हे पाहून लसीकरणाचा वेग आणखी वाढवल्यास तिसऱ्या लाटेपूर्वी नागरिकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढीस लागू शकते. या उद्देशाने देशभरातील नागरिकांचे वेगाने लसीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. 08 ते 14 ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारने राबवलेल्या कवचकुंडल मोहिमेअंतर्गत औरंगाबादमध्येही विशेष केंद्र स्थापन करून लसीकरण करण्यात आले. 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात 6 लाख नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतल्याची आकडेवारी जिल्हा प्रशासकांकडून कळवण्यात आली आहे.

गेल्या दीड वर्षापासून जगभरात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने थैमान घातले. या काळात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झापाट्याने वाढून अनेकांचा जीव गमवावा लागला. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. लोकांनी लस टोचून घ्यावी, यासाठीदेखील लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यात विविध ठिकाणी कँप लावण्यात आले.

औरंगाबाद शहरासाठी 10 लाख 55 हजार 654 नागरिकांना लस देण्याचे टार्गेट होते. तसेच ग्रामीण भागातील 21 लाख 69 हजार 23 लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. अशा प्रकारे औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 32 लाख 24 हजार 677 नागरिकांना लसवंत करण्याचे टार्गेट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत यातील ग्रामीण भागात 10 लाख 33 हजार 691 तर शहरी भागात 6 लाख 5 हजार, 663 असे एकूण 16 लाख 39 हजार 354 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर ग्रामीण भागात 3 लाख 1 हजार 448 व शहरी भागातील 3 लाख 37 हजार 173 नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. म्हणजेच दोन डोस घेणाऱ्यांची एकूण संख्या 6 लाख 38 हजार 621 अशी आहे. नियोजित टार्गेटनुसार पहिला डोस घेतलेल्यांची टक्केवारी 50.84 आहे तर दुसरा डोस घेतलेल्यांची टक्केवारी 19.80 एवढी आहे.

Leave a Comment