काँग्रेसला मतदान करून महापुराचा बदला घ्या – जयंत पाटील

महापुराच्या काळात भाजप सरकारने मदत केली नाही. मंत्री व आमदारांनी सांगलीत येऊन शो बाजी केली. पुरामुळे सात दिवस जनतेचे आतोनात हाल झाले. त्याचा बदला घेण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने काँग्रेसला साथ द्यावी व कमळाबाईने दिलेला त्रास वसूल करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. महाअघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ सांगलीवाडी येथील राम मंदिरसमोर सभा पार पडली. या सभेत आ.जयंत पाटील बोलत होते. सभेला विश्वजीत कदम, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, संजय बजाज, कमलाकर पाटील आदी उपस्थित होते.

अलमट्टीच्या बॅकवॉटरमुळे महापूर आला नसल्याचा खुलासा

कर्नाटकचे पाणी जतला मिळाले पाहिजे. मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी कर्नाटकचे पाणी जतला देणार म्हणतात. ते शक्य वाटत नाही. दोन्ही राज्यांनी एकत्रित बसून निर्णय घेणे आवश्यक आहे. मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे याबाबतीत मौन आहे. त्यामुळे भाजपचे हे खोटे आश्वासन ठरणार असल्याचा आरोप कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी पत्रकार बैठकीत केला. तर अलमट्टीच्या बॅकवॉटरमुळे महापूर आला नसल्याचे त्यांनी सांगितले.

माण-खटाव येथील उध्दव ठाकरेंची आजची सभा अचानक रद्द!

माण-खटाव विधानसभेच्या निवडणूकी निमित्त शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांच्या प्रचारार्थ आज सकाळी दहिवडी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार होती. परंतू खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण मुंबईतून न होवू शकल्याने ते दहिवडी येथे पोहोचू न शकल्याने त्यांची आज होणारी सभा रद्द झाली.

महाराष्ट्रात मोदी-शहांच्या सभांचा धुराळा ! सोनिया गांधी, प्रियांका गांधी आहेत तरी कुठे?

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धडाका सुरु आहे. एकीकडे भाजप – शिवसेनेला त्यांची सत्ता टिकवून ठेवायची आहे, तर दुसरीकडे ‘आघाडी’साठी ही निवडणूक त्यांचं राजकारणातील भविष्य ठरवणारी आहे. मात्र, असं असलं तरी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचारापासून दूरच आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकांकडे सोनिया गांधींनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे.

हर्षवर्धन जाधव यांना उद्धव ठाकरेंवर केलेली टीका भोवली !’आचारसंहिता भंगा’चा गुन्हा दाखल

कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची नोंद घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह विधान भोवण्याची चिन्ह आता दिसत आहेत. कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्यात हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

उजनीचे पाणी सोलापूरला मिळू शकतं तर मग लातूरला का मिळू शकत नाही? – सुशीलकुमार शिंदे

‘जर उजनी धरणातील पाणी १२० किमी लांब असलेल्या सोलापूरला मिळू शकतं तर मग लातूरला का मिळू शकत नाही?’ असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सरकारला धारेवर धरले. लातूरमध्ये आयोजित प्रचार सभेत शिंदे बोलत होते. लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अनुक्रमे अमित आणि धीरज विलासराव देशमुख यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या सभा लातूर मध्ये झाल्या. यावेळी शिंदे यांनी उपस्थित जनसमूहाला संबोधित केले.

भाजपचा जाहिरनामा नव्हे तर जुमलानामा आहे- काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत

भाजपने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपला जाहीरनामा संकल्पपत्र नावाने प्रसिध्द केला आहे. मात्र हा प्रसिध्द करण्यापूर्वी त्यांनी सन २०१४ च्या निवडणुकीचा जाहिरनामा पहायला हवा होता. २०१९ मध्ये प्रसिध्द केलेल्या जाहिरनाम्यातील अनेक आश्वासने ही २०१४ च्या निवडणुकीत दिलेली होती. मग ही आश्वासने पाच वर्षात का पूर्ण केली नाहीत? त्यांचे हे अपयश आहे, यावर्षीचा त्यांचा जाहिरमाना म्हणजे ‘जुमनलानामा’ असल्याचा टोला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार बैठकीत लगावला.

कोल्हापूर उत्तरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षिरसागर कोल्हापूरच्या नेटकाऱ्यांकडून ट्रोल

प्रचाराच्या वेगात शिवसेनेचे कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षिरसागर यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात झालेल्या चुकांमुळे कोल्हापूरच्या नेटकाऱ्यांमधून चांगलेच ट्रोल होत आहेत. आज दिवसभर या जहिरनाम्यातील चुकीमुळे सोशल मिडिया मध्ये चांगलीच चर्चा रंगत आहे.

गावकऱ्यांनी केली भाजप आमदाराला ‘गावबंदी’ बैलगाड्या आडव्या लावून अडवली गाडी

निवडणूक प्रचारासाठी गावात येत असलेल्या भाजप उमेदवार आणि विद्यमान आमदाराची गाडी गावात येण्यापूर्वीच गावकऱ्यांनी बैलगाड्या आडव्या करून अडवली. तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव येथे हा प्रकार घडला. अकोट मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि भाजप उमेदवार प्रकाश भारसाकळे यांना वान प्रकल्पाच्या मुद्द्यावरून परिसरातील काही गावांनी गावबंदी केली आहे.

मी स्वयंपाक करेन, पण अजित पवारांचे पाणी आपल्याला चालेल का? – उद्धव ठाकरे

”जेवणाच्या ताटात पवार खडे का टाकतात ? गरिबांसाठी १० रुपयांत जेवण उपलब्ध करून दिले यात काय वाईट? याच गरिबांसाठी स्वयंपाक करण्याची वेळ माझ्यावर आली तरी करेन. मी स्वयंपाक करेन, पण अजित पवार पाणी देतील ते पाणी आपल्याला चालेल का? असा सवाल उपस्थितांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी शरद पवारांवर सुद्धा हल्लाबोल केला. कोल्हापूर उत्तर शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय मंडलिक,  अरुण दुधवडकर यांच्यासह भाजप आणि सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.