सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारने शिक्षक भरती घेतली नाही. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन परीक्षा ही 2017 सालापासून घेण्यात आली नाही. त्यामुळे बीएड आणि डीएड झालेले हजारो विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ही परीक्षा झाली नसल्याने अनेक विद्यार्थी वयोमर्यादा संपण्याच्या मार्गावर आहेत. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात शिक्षकांची पदे ही रिक्त आहेत.
त्यामुळे शासनाने तातडीने शिक्षक भरती घ्यावी या मागणीसाठी आज पवित्र शिक्षक संघर्ष समितीच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर वर्क दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. दुसरी अभियोग्यता परीक्षा घ्यावी, प्राध्यापक व शिक्षक भरती करावी, अभियोग्यतेचा अभ्यासक्रम जाहीर करावा, मागील शिक्षक भरती त्वरित पूर्ण करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुणे येथे आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संघटनेच्यावतीने देण्यात आला.