भांबवली, वजराई मार्गावरील दरड दोन वृध्दांनी हटवली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत. अशातच पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भांबवली धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गावरील दरड कोसळली होती. प्रशासन नियमांचे गाऱ्हाणे मांडत असताना दोन वृध्दांनी रस्त्यावर कोसळलेली भली मोठी दरड स्वतः हटवली. प्रशासकीय यंत्रणा पोहोचण्यापूर्वीच एकट्या आजोबांनी संपूर्ण दरड हटवून वाहतूक सुरळीत केली. चंद्रकांत मोरे (वय- 65 वर्षे), बळीराम सपकाळ (वय- 50 वर्षे) या दोघांनी दरड हटवली.

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये गेले काही दिवस जोरदार पाऊस झाला. यामुळे ठिकठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भाग हा अतिदुर्गम समजला जातो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या ठिकाणी दळणवळण कठीण होऊन बसतं. सतत पडणाऱ्या जोरदार पावसाने रस्त्यावर दरडी कोसळून रस्ते बंद होतात. यामुळे या ठिकाणच्या लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. अशाच एका समस्येला भांबवली गावातील लोकांना सामोरं जावं लागल. कास शेजारील भांबवली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यात काही दिवसांपूर्वी दरड कोसळली होती. यामुळे भांबवली गाव आणि वजराई धबधब्याकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. यामुळे ग्रामस्थ आणि पर्यटकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होत.

ग्रामस्थ आणि पर्यटकांची अडचण लक्षात घेऊन दोन स्थानिक वृद्ध समाजसेवकांनी प्रशासनाच्या यंत्रणेची वाट न पाहता मेहनत करत कोसळलेली दरड स्वत: हटवून रस्ता मोकळा करुन दिला. चंद्रकांत मोरे (वय- 65 वर्षे), बळीराम सपकाळ (वय- 50 वर्षे) या दोघांनी भर पावसात प्रचंड मेहनत घेऊन दरड हटवली. भांबवली- वजराई धबधबा हा तीन टप्प्यात कोसळणारा भारतातील सर्वात उंच धबधबा असल्यामुळे या ठिकाणी भेट देण्यासाठी पर्यटक पुणे, मुंबईहून साताऱ्याला येतात.

Leave a Comment