राजकीय दंगलीत तुमची आमच्या संघर्षाला साथ हवी; राज ठाकरेंचं मराठी भाषिकांना आवाहन पत्र

Raj Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ठाकरे आणि शिंदे गटातील सत्तासंघर्षामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात राजकीय सत्तासंघर्षाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळावा म्हणून पत्रव्यवहार करणारा पक्ष पण आमचाच पहिला पक्ष आहे. परंतु सध्या जी राजकीय दंगल सुरु आहे त्यावरुन भाषेचं पुढे काय होईल? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिले असून त्यामध्ये त्यांनी मराठी भाषेबद्दल सरकारकडून आणि जनतेकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.

राज ठाकरेंनी त्यांच्या पत्रात म्हंटले आहे की, कुसुमाग्रजांच्या सांस्कृतिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाला अभिवादन म्हणून तेंव्हाच्या सरकारने, कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, २७ फेब्रुवारी, ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून घोषित केला. पण नेहमीप्रमाणे सरकारी उदासीनतेत तो साजरा व्हायचा. कुठल्याही राजकीय पक्षाला देखील तो साजरा करायची इच्छा नव्हती. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तो अत्यंत उत्साहात साजरा करायला सुरुवात केली.

मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळावा म्हणून पत्रव्यवहार करणारा पक्ष पण आमचाच पहिला. हे सगळं सांगायचा उद्देश इतकाच की, आपल्या भाषेसाठी, आपल्या सणांसाठी, आपल्या संस्कृतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून इतर एकही पक्ष हिरहिरीने पुढे आलेला नाही. आणि सध्या जी एकूणच जी राजकीय दंगल सुरु आहे, त्यात कोणी येईल अशी शक्यता वाटत नाही.

असो, त्यामुळेच आजच्या दिवशी आपल्या लाडक्या मराठी भाषेच्या गौरव दिनानिमित्त शुभेच्छा देताना, ह्या भाषेसाठी आपल्याला सगळ्यांना उभं रहावं लागणार आहे हे भान सोडून चालणार नाही. व्यवहारात मराठी, प्रशासनात मराठी, दूरसंचार माध्यमांमध्ये मराठी, दूरदर्शनच्या समालोचनात मराठी इथपासून ते अभिजात भाषेच्या दर्जासाठी आम्ही संघर्ष केला, आणि पुढे देखील करू. पण त्यासाठी तुमची आमच्या संघर्षाला साथ हवी तरच हे शक्य आहे.

मला माहिती आहे, मनसेकडूनच तुमच्या सगळ्या बाबतीत अपेक्षा असतात, पण ह्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुमच्या साथीची गरज आहे. आपण ‘मराठी एकत्र’ असू तर ‘सर्वत्र मराठी’ करायला क्षणाचाही विलंब लागणार नाही. मी माझ्या विकास आराखड्यात म्हणलं आहे तसं, मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपलं स्वप्न असायला हवं. हे स्वप्न वास्तवात यावं, ह्याच आजच्या दिवसाच्या शुभेच्छा !, असे ठाकरेंनी त्यांच्या पत्रात म्हंटले आहे.