भारतात वाढतेय कॅन्सरचे प्रमाण; तब्बल 9.30 लाख रुग्णांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॅन्सर (Cancer) म्हणजे कर्करोगाचा प्रसार जगभर होत आहे. मनुष्याची बदललेली जीवनशैली आणि बदलता आहार, आहारातील भेसळयुक्त पदार्थ, वाढलेले प्रदूषण, व्यसने यांमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. लॅन्सेट या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या नव्या संशोधनपर लेखातून हे वास्तव उघड झाले आहे. 2019 मध्ये चीन – 27, भारत – 9.3 आणि जपान – 4.4 लाख लोकांचा मृत्यू कॅन्सरने झाला आहे. हे सर्व देश आशिया खंडात येतात. आणि आशिया खंडात भारत हा कॅन्सरने मृत्यू होणारा 2 नंबरचा देश आहे, असे लॅन्सेट या नियतकालिकामधील लेखात नमूद केले आहे.

कॅन्सरने मृत्यू होण्याची अनेक कारणे आहेत, जवळपास 34 कारणांमुळे कॅन्सर रोग उद्भवतो. धूम्रपान, अल्कोहोलचे सेवन, तंबाखू आणि प्रदूषणात होणारी वाढ कॅन्सरचा रोग उद्भवण्यास कारणीभूत ठरते. आशियामध्ये वायू प्रदूषणामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढू लागले आहे. रस्त्यांवर वाढलेली वाहने, वाढते नागरीकरण यामुळे कॅन्सरला बळ मिळत आहे. मनुष्याच्या आहारात रसायनयुक्त आहार जात असल्याने सर्वत्र कॅन्सरची लागण होत आहे. यात लहान मुलेही आहेत. तरुणांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे व खैनी, गुटखा, पानसुपारीमुळे कॅन्सरचा प्रभाव वाढला आहे.

आशियातील चीन, भारत आणि जपानमध्ये कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात आणि कॅन्सरमुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. आशिया खंडातील या देशांत 2019 या वर्षात 94 लाख लोक कॅन्सरग्रस्त होते. त्यापैकी ५६ लाख लोक मृत्युमुखी पडले. आशिया खंडात कर्करोगाचा विळखा बसणे चिंताजनक आहे, असे लॅन्सेट या नियतकालिकाच्या अहवालात नमूद केले आहे. हा अहवाल सादर करण्यासाठी व त्याचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी 1990 ते 2019 या कालावधीत आशिया खंडातील ४९ देशांतील कॅन्सरच्या २९ विभागातील रुग्णांचा अभ्यास करण्यात आला होता. 10 वर्षांच्या अभ्यासात कॅन्सरमुळे निर्माण झालेला धोका, त्याचे तीव्रता याबाबत संशोधकांनी अभ्यास करून हा निष्कर्ष काढला.

गर्भाशय कॅन्सरचे प्रमाण वाढले

– आशिया खंडात श्वासनलिका आणि फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त आहे. 13 लाख रुग्णांना कॅन्सरचे निदान झाले असले तर तर 12 लाख जणांचा मृत्यू होतो. म्हणजे कॅन्सर झालेल्यांपैकी 92 टक्के लोकांचा मृत्यू आशिया खंडात होतो. आशिया खंडांतील अनेक देशांत महिलांमध्ये, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होणे ही समस्या आहे.भारत हा अशा रुग्णांमध्ये 2 रा देश आहे. श्वासनलिका आणि फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आहे हे विशेष. सर्वाधिक कॅन्सर रुग्णांमध्ये श्वासनलिका कॅन्सर झालेल्यांचे प्रमाण जास्त आहे. तसेच आशिया खंडात स्तन कॅन्सर,- कोलन कॅन्सर,-गुदाशय कॅन्सर, पोट आणि नॉन मेलोनोमा त्वचेचा कॅन्सर असणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे.

कॅन्सरचा धोका या देशांत वाढतोय?

आशिया खंडात चीन, भारत आणि जपानमध्ये कॅन्सरचे प्रमाण अधिक असले तरी त्यासोबत नेपाळ, कतार, बांगलादेश आणि पाकिस्तानमध्येही कॅन्सरचा धोका वाढत आहे. भारतात बहुतांश मृत्यू हे ओठ आणि तोंडाचा कॅन्सर झाल्यामुळे होत असताना दिसतात. तंबाखूमुळे कॅन्सरसोबतच अन्ननलिका आणि स्वादुपिंडाच्या कॅन्सरचा धोका वाढत असल्याचे संशोधकांच्या अभ्यासात आढळले आहे.