फडणवीसांनी बिहारला प्रचाराला जाण्यापेक्षा दिल्लीला जावं ; उद्धव ठाकरेंचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोलापूर दौऱ्यावर जाऊन अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटपही केले. यानंतर त्यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. हे सरकार शेतकऱ्यांच सरकार आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली.त्याचवेळी त्यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

गरज असताना केंद्राकडे मदत मागितली तर गैर काय? पंतप्रधानांनीही फोन करून मदत करण्याचं आश्वासन दिलं. पाऊस विचित्र पद्धतीने पडतोय, टार्गेट केल्यासारखा पडतोय. देवेंद्र फडणवीस बिहारला जातात त्यांनी दिल्लीला जावं पंतप्रधान घराबाहेर पडतील. केंद्र सरकार हे परदेशातील सरकार नाही. ते देशाचं सरकार आहे. विरोधक केवळ पक्षाचा विचार करत असतील, केंद्रातील सरकार देशाचं आहे. त्यांनी पक्षपात न करता मदत करणं अवश्यक आहे. मोदींनीही फोन करून मदतीचं आश्वासन दिलं,. त्यामुळे त्यांना त्याची जाणीव आहे , असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

राजकारणाचा चिखल कुणी एकमेकांवर उडवू नये. केंद्र काय करणार आणि राज्य काय करणार या पेक्षा राज्याला केंद्राच्या मदतीची गरज असेल तर सर्वांनी एकत्र येऊन ही मागणी मागितली पाहिजे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस –

शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे. केंद्र सरकार राज्याला सहाय्य करेलच. पण राज्य सरकारनं टोलवाटोलवी न करता आधी मदतीची घोषणा करावी, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारनं मदत द्यावी. सोयीस्कर भूमिका घेऊ नये. सगळंच केंद्रावर ढकलायचं असेल, तर मग राज्य सरकार कशासाठी आहे, असा सवाल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला केला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment