राजीनामा देऊन उद्धव ठाकरे चुकले? कोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्षांवर आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी सुरु आहे. आज सुद्धा ठाकरे गटाकडूनच युक्तिवाद करण्यात आला. यावेळी कपिल सिब्बल आणि अभिषेक मनुसंघवी यांच्या कडून राज्यपालांचे अधिकार, मुख्य प्रदोताची निवड आणि बहुमत चाचणीवरून शिंदे गटाला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र उद्धव ठाकरेंनी अचानक दिलेला राजीनामाच त्यांची अडचण ठरण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा ही त्यांची चूक असल्याचं महत्त्वाचं निरीक्षण सरन्यायाधीशांनी यावेळी नोंदवले आहे.

आज लंच ब्रेकनंतर ठाकरे गटाकडून अभिषेक मनुसंघवी यांनी युक्तिवाद सुरु केला. यावेळी त्यांनी २९ आणि ३० जून रोजी घडलेल्या घटनाक्रमाचा उल्लेख केला. २९ जून रोजी कुणालाही माहिती नव्हतं की जेव्हा ३० तारखेला विश्वासदर्शक ठराव होईल त्यावेळी काय होईल? यासंदर्भात तांत्रिक शब्द हा विश्वासदर्शक ठराव आहे, पण सभागृहात बहुमत चाचणीसाठीच परवानगी देण्यात आली. परंतु जर त्यावेळी ३९ आमदारांनी विरोधात मतदान केलं असतं तर ती बहुमत चाचणी अपरिहार्य ठरली असती. त्यामुळे मतदान चाचणीमध्ये अपमान सहन करण्यापेक्षा आधीच राजीनामा देऊन बाजूला होणं हा एक निष्कर्ष त्यातून काढला गेला असे अभिषेक मनुसंघवी यांनी म्हंटल.

यानंतर मात्र कोर्टाने एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवलं . तुमच्या विरोधात 39 आमदारांनी कुठेही मतदान केलं नाही. तुम्ही बहुमत चाचणीला पुढे गेला नाही असा सवाल कोर्टाने केला. तुम्ही बहुमत चाचणीला सामोरं गेला असता आणि 39 आमदारांमुळे हरला असता तर आम्ही ती बहुमत चाचणी रद्द केली असती पण तुम्ही राजीनामा दिल्यानं अधिकार गमावला आहे असे स्पष्ट निरीक्षण कोर्टाने नोंदवले. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.