दिलीप वळसे पाटलांचा पवारांवर हल्लाबोल; म्हणाले, उत्तुंग नेते असूनही….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांच्या बंडानंतर त्यांच्या गटात सामील झालेले एकेकाळीचे शरद पवार (Sharad Pawar) यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणाऱ्या दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रथमच शरद पवारांवर थेट हल्ला करत त्यांच्या राजकारणाचीच चिरफाड केली आहे. शरद पवार हे उत्तुंग नेते आहेत, त्यांच्या तोडीचा नेता दुसरा कोणी देशात नाही, पण तरीही त्यांना एकदाही राज्यात एकहाती सत्ता आणता आली नाही असं म्हणत वळसे पाटलांनी पवारांच्या मर्मावरच बोट ठेवलं.

मंचर येथील एका कार्यक्रमात बोलत असताना वळसे पाटील म्हणाले, शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही असं आपण म्हणतो. परंतु दुसऱ्या बाजूला पवार साहेबांच्या ताकदीवर किंवा नेतृत्वाखाली मया महाराष्ट्रातील जनतेने एकदाही बहुमत दिले नाही. एकदाही स्वतःच्या ताकतीवर मुख्यमंत्री केलं नाही. अनेक राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष आहेत. ते पुढे जात आहेत, पण आम्ही काय ६०- ७० जागांच्या पुढे जाऊ शकत नाही. मग कोणाशी तरी आम्हाला आघाडी करावी लागते म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो असं वळसे पाटील यांनी म्हंटल.

दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांच्या या विधानाचा रोहित पवारांनी चांगलाच समाचार घेतला आहे. मला आश्चर्य वाटतंय. तुम्हीही शरद पवार यांच्या आसपासचे नेते होता, मग तुम्ही का नाही जबाबदारी पार पाडली? तुम्ही जबाबदारी पार पाडली नसेल म्हणूनच आजपर्यंत राष्ट्रवादीला बहुमत मिळालं नाही असं लोक म्हणतील असं प्रत्युत्तर रोहित पवारांनी दिले. पवार साहेबानी आतापर्यंत ज्यांना ताकद दिली तेच नेते त्यांना या वयात असं म्हणत असतील तर त्यांना याबाबत किती हक्क आहे हाच प्रश्न आहे असं रोहित पवार यांनी म्हंटल.