Express Highway : देशातील सर्वांत मोठ्या 7 महामार्गांचे काम सुरु; कोणकोणत्या जिल्ह्यांतून जाणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात रस्त्यांची कामे अंत्यंत वेगवान पद्धतीने सुरु आहेत. दळणवळण आणि चांगल्या वाहतुकीसाठी उत्कृष्ट रस्ते असणं आवश्यक आहे. हेच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन गेल्या काही वर्षांपासून देशात अनेक मोठमोठे एक्सप्रेसवे तयार करण्यात आले आहेत तर अनेक रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. येत्या 2 वर्षात देशाला तब्बल 7 एक्सप्रेसवे (Express Highway) मिळणार आहेत. सध्या या महामार्गांचे काम सुरु आहे. 4000 किमी लांबीचे हे महामार्ग देशातील 9 राज्यांमधून जात आहेत. चला जाणून घेऊया या एक्सप्रेसवे बाबतीत सविस्तरपणे..

Delhi-Mumbai Expressway

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे – Delhi-Mumbai Expressway

या यादीत दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेचा क्रमांक पहिला येतो. देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला जोडणारा हा महामार्ग पूर्णपणे खुला झाल्यानंतर दोन्ही शहरांमधील प्रवासाचा कालावधी केवळ 12 तासांचा असेल. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. एवढेच नाही तर दिल्ली ते गोवा हे अंतरही या एक्स्प्रेस वेमुळे कमी होणार आहे. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे हा दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या 5 राज्यांमधून जाईल.

Mumbai-Nagpur Samrudhi Highway

मुंबई- नागपूर सम्रुद्धी महामार्ग – Mumbai-Nagpur Samrudhi Highway

महाराष्ट्रातील मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा प्रकल्पही सरकारचा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हे नंतर अवघ्या 8 तासांत पार करता येणार आहे. 701 किलोमीटर लांबीचा एक्स्प्रेस वे 10 जिल्हे आणि सुमारे 390 गावांमधून जातोय. यामध्ये कल्याण, नागपूर, नाशिक, वर्धा, भिवंडी, औरंगाबाद आणि शिर्डी यांचा समावेश आहे. या द्रुतगती मार्गावर सुमारे 5 उड्डाणपूल, 33 पूल, 25 इंटरचेंज, 189 अंडरपास, 6 बोगदे, हलक्या वाहनांसाठी 110 अंडरपास आणि पादचाऱ्यांसाठी 209 अंडरपास असतील.

Bangalore-Chennai Expressway

बंगळुरू-चेन्नई एक्स्प्रेस वे- Bangalore-Chennai Expressway

दक्षिण भारतातील २ महत्त्वाच्या शहरांना जोडणारा हा बंगळुरू-चेन्नई एक्स्प्रेस वे अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा ४ लेन एक्सप्रेस वे जवळपास 260 किलोमीटर लांब असून 3 राज्यांमधून जाईल. हा एक्स्प्रेस वे कर्नाटकातील होस्कोटे आणि बंगारापेट, आंध्र प्रदेशातील पलामनेर आणि चित्तूर आणि तामिळनाडूमधील श्रीपेरुंबदूरपर्यंत जाईल. बंगळुरू-चेन्नई एक्स्प्रेस वे मुळे दक्षिण भारतातील तिन्ही मुख्य राज्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.

Delhi-Amritsar-Katra Expressway

दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवे – Delhi-Amritsar-Katra Expressway

उत्तर भारतातील दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवे 650 किमीचा आहे. दिल्लीतील बहादूरगड सीमेपासून थेट जम्मूमधील कटरापर्यंत जाईल. या एक्सप्रेसवेमुळे वैष्णो देवी मंदिर आणि सुवर्ण मंदिर यांसारख्या तीर्थक्षेत्रांना भेट देणाऱ्या भाविकांना मोठा फायदा होणार आहे. हा एक्स्प्रेस वे दिल्ली, पंजाब, जम्मू-काश्मीर आणि हरियाणामधून जाणार आहे. दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवेमुळे पर्यटन आणखी वाढेल आणि प्रवाशांचा त्रास कमी होईल.

Raipur-Visakhapatnam Expressway

रायपूर-विशाखापट्टणम एक्सप्रेसवे- Raipur-Visakhapatnam Expressway

हा रायपूर-विशाखापट्टणम इकॉनॉमिक कॉरिडॉरचा एक भाग आहे. 464 किमी लांबीचा हा 6 लेन एक्सप्रेसवे ओडिशा, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशमधून जाईल. हा एक्स्प्रेस वे २०२५ पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या छत्तीसगडपासून विशाखापट्टणम मधील अंतर सुमारे 546 किलोमीटर आहे. मात्र या नव्या महामार्गामुळे हेच अंतर ४६३ किमी इतके कमी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यास मोठी मदत होणार आहे.

Ganga Expressway

गंगा एक्सप्रेस वे – Ganga Expressway

उत्तर प्रदेशातील मेरठ ते प्रयागराजकडे जाणारा गंगा एक्सप्रेस वे 594 किमी लांबीचा आहे. 12 जिल्ह्यांमधून जाणारा हा एक्स्प्रेस वे ग्रीनफिल्ड प्रकल्प आहे. या एक्सप्रेसवेच्या माध्यमातून प्रयागराज जिल्ह्यातील जुडापूर दांडूपासून ते मेरठ जिल्ह्यातील बिजौलीपर्यंत थेट प्रवास करता येईल. सध्या मेरठ ते प्रयागराज दरम्यान प्रवास करण्यासाठी ११ तासांचा वेळ लागतो मात्र या नव्या महामार्गामुळे हे अंतर आपणास ८ तासांत पार करता येणार आहे. हा एक्सप्रेसवे उत्तरप्रदेशातील प्रतापगड, रायबरेली, उन्नाव, हरदोई, शाहजहांपूर, बदायूं, संभल, अमरोहा, बुलंदशहर आणि हापूरसह प्रमुख शहरांना जोडेल.

Delhi-Goa Expressway

दिल्ली- गोवा एक्सप्रेसवे – Delhi-Goa Expressway

दिल्लीपासून सुरू होणारा दिल्ली- मुंबई द्रुतगती मार्ग दिल्ली ते मुंबईपर्यंत पोहोचेल आणि मुंबईनंतर कोकणात प्रवेश करेल. या प्रवासावेळी प्रवाशांना अद्भुत प्रवासाचा अनुभव मिळेल. सध्या, दिल्लीहुन गोव्याला जाणयासाठी 35 तास लागतात. परंतु या नवीन एक्सप्रेस वे मुळे गोवा ते दिल्ली अंतर अवघ्या 15 तासांत पूर्ण होणार आहे.