हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अखेर राष्ट्रवादीच्या अनिल देशमुखांना आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावाच लागला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे देशमुखांना गृहमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले आहे. पण, सरकारला जे जरी उशिरा सुचले असेल पण आणखी अनेक राजीनामा घेतल्यावरच दुरुस्त म्हणता येईल, असं म्हणत भाजपच्या नेत्या आणि माजी महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला.
अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर एकच भडीमार सुरू केला आहे. पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून ठाकरे सरकारला चांगलाच टोला लगावला आहे. ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. देर आये पर दुरुस्त नहीं आये ‘, या सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील म्हणजे ‘दुरुस्त आये ‘ म्हणणे शक्य तरी होईल, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी टोला लगावला.
गृह मंत्री यांचा राजीनामा' देर आये पर दुरुस्त नहीं आये ', या सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील म्हणजे 'दुरुस्त आये ' म्हणणे शक्य तरी होईल..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 5, 2021
दरम्यान, ‘सचिन वाझे प्रकरण, मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही गृहमंत्रिदाचा राजीनामा दिला आहे. राज्यात एवढ्या भयानक घडामोडी घडत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत का नाहीत, त्यांचे मौन अस्वस्थ करणारं आहे’ अशी खोचक टीका भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
‘परमबीर सिंग यांनी जे काही आरोप केले होते. त्याबद्दल मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला आहे. त्यानंतर हे अपेक्षितच होतं की राजीनामा आवश्यक होता. हा राजीनामा उशीरा झाला आहे, तात्काळ राजीनामा घ्यायला हवा होता, पण आज देशमुख यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आहे, पण ही नैतिकता पहिल्या दिवशीच आठवायला हवी होती, असा टोला फडणवीस यांनी देखील लगावला आहे.




