शेतात काबाडकष्ट करून जिद्दीच्या जोरावर झाले उपजिल्हाधिकारी; मिनाज मुल्ला यांची प्रेरणादायी यशोगाथा…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दररोज शेतात काबाडकष्ट करून अधिकारी होण्याची स्वप्ने प्रत्येक उच्च शिक्षित तरुण पाहत असतात. असेच स्वप्न उराशी बाळगून त्याला सत्यात उतरवले आहेत ते सांगोला तालुक्यातील एखतपुर येथील मिनाज मुल्ला यांनी होय. शेतात काबाडकष्ट करुन एमपीएससीत ओबीसी प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांकाने मिनाज उत्तीर्ण झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मुस्लीम समाजातील दुसरे उपजिल्हाधिकारी होण्याचा बहुमान मिळवलेले मिनाज मुल्ला हे सध्या सातारा उपविभागीय अधिकारी म्हणून ते कार्यरत आहे. पाहूया त्यांची प्रेरणादायी यशोगाथा…

उपजिल्हाधिकारी पदाचा बहुमान प्राप्त केलेल्या मिनाज मुल्ला यांचे दुष्काळी पट्ट्यातील सांगोला हे गाव. घरी आई-वडील दोघेही शेतकरी. मिनाज यांची घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने अशात कोरडवाहू चार एकर शेती होती. मोठ्या भावाचे सातवीपर्यंत व बहिणीचे दहावीपर्यंत फक्त शिक्षण झलेले. अशा परिस्थितीत मिनाज यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले.

त्यांनी शिक्षणासाठी शहरात येण्याचा विचार केला. शहरात मिनाज यांचे वडील सुरुवातीला टेलरिंग (शिवणकाम) काम करत असत. घरात शिक्षणाची कमतरता होती परंतु आई वडिलांची आपल्या मुलांनी खूप शिकाव व मोठं व्हावे ही इच्छा. त्यातून मिनाज यांनी सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूल मधून दहावीत 83 टक्के गुण प्राप्त करत यश मिळवले. पुढे त्यांनी विद्यामंदिर प्रशालामधून बारावीचे शिक्षण घेत चांगल्या 83 टक्के मिळवत उत्तीर्ण झाले.

मिनाज यांचा नंतर बारावीत मिळालेल्या मार्कांच्या जोरावरच एमबीबीएससाठी शासकीय महाविद्यालयात नंबर लागला. परंतु घरच्या अपरिस्थितीमुळे त्यांनी महाविद्यालयात प्रवेश न घेता डीएड करण्याचा निर्णय घेतला. आणि एखतपुर (ता.सांगोला) येथुन त्यांनी डीएडचे शिक्षण पूर्ण केले. या ठिकाणी मिनाज यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवत यश मिळवले.

शिक्षकाची नोकरी करत स्पर्धा परीक्षेची तयारी –

त्यांनी इंग्लिश मधून ‘बीए’ चे प्रथम वर्गात शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे मिनाज यांनी आपले सर्व शिक्षण घरची शेती सांभाळत पुर्ण केले . घरची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी डिएडनंतर लगेच शिक्षकाची नोकरी पकडली. रॉकेलच्या दिव्यावर अभ्यास करून त्यांनी आपले डीएडचे शिक्षण पूर्ण केले. या काळात त्यांच्या मित्रांच्या साहाय्याने त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली.

तलाठी पदापासून शासकीय नोकरीला सुरुवात –

विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचा क्लास न लावला फक्त आईवडिलांचा पाठिंबा, पत्नी शबाना आणि मित्रांच्या साहाय्याने मिनाज यांनी अनेक पदाच्या परीक्षा दिल्या. त्यामध्ये त्यांनी सुरुवातीला तलाठी पदाची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात तलाठी झाले. त्यानंतर गट ‘ब’ साठी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाची त्यांनी परीक्षा दिली. मात्र, त्यांना मुलाखत देता आली नाही. मात्र, त्यांनी हार मानली नाही आपल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी राज्य सेवेचीही परीक्षा दिली आणि मुख्याधिकारी झाले. त्यानंतर त्यांनी आपले पुढील प्रयत्न सुरु ठेवले आणि अखेर त्यांनी ओबीसी प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवत उपजिल्हाधिकारी परीक्षेत यश मिळवले.