जुन्या वादातून तीन सख्ख्या भावांवर हल्ला, 12 वर्षांनी आरोपीला शिक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – कल्याणमध्ये 12 वर्षांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये जुन्या वादातून तीन सख्ख्या भावांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. यामध्ये दोन भावांचा मृत्यू झाला होता तर एक भाऊ गंभीररित्या जखमी झाला होता. तब्बल बारा वर्षांनी आज या प्रकरणातील आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आरोपीचे नाव संजय पाटील असे असून त्याला कल्याण कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 3 डिसेंबर 2010 च्या रात्री ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिमेकडील रामदास वाडी परिसरात रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास हि घटना घडली होती.

काय आहे प्रकरण?
3 डिसेंबर 2010 च्या रात्री रामवाडी परिसरात राहणाऱ्या देवकर कुटुंबातील तीन सख्खे भाऊ अशोक देवकर ,कृष्णा देवकर आणि रामदास देवकर हे रस्त्यावर गप्पा मारत फिरत होते. यावेळी अचानक दोन जण बाईक वरून आले. मनोज खांडगे नावाचा व्यक्ती बाईक चालवत होता तर संजय पाटील नावाचा व्यक्ती पाठीमागे बसला होता. यातील संजय पाटील याच्या हातात धारदार शस्त्र होते. त्याने बाइकवरून खाली उतरताच देवकर बंधूंवर प्राणघातक हल्ला केला.

नेमकं काय घडलं?
आरोपी संजय पाटील याने आधी अशोक देवकर यांच्यावर हल्ला केला. नंतर कृष्णा देवकर याच्यावर हल्ला केला. तर मध्यस्थी करण्यास आलेल्या रामदास याच्यावर देखील त्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अशोक आणि कृष्णा देवकर यांचा मृत्यू झाला, तर रामदास गंभीर जखमी झाला आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून दोन्ही आरोपींना अटक केली. यानंतर आरोपी संजय पाटील याने जुन्या वादातून हा हल्ला केल्याचे कबूल केले. या घटनेच्या दोन वर्षानंतर आरोपी मनोज खांडगेचा मृत्यू झाला होता तर दुसरा आरोपी संजय पाटील याला या प्रकरणी 12 वर्षानंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

Leave a Comment