स्थलांतरीत मजुरांच्या प्रश्नावरून मेधा पाटकरांनी ठोठावले सुप्रीम कोर्टाचे दरवाजे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना संकटात स्थलांतरीत मजुरांचा प्रश्न ज्वलंत बनला आहे. हातच काम गेल्यानं अनेकांनी घरची वाट धरली आहे. मात्र, घरी जाण्यासाठी पैशाअभावी आणि सरकारी प्रक्रियांमध्ये अडचणीत सापडलेल्या मजुरांचे हाल होत आहे. स्थलांतरीत मजुरांची सद्य परिस्थिती पाहून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

मेधा पाटकर यांनी सर्वोच्च न्यायालयात स्थलांतरीत मजुरांच्या प्रश्नांसंदर्भात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी स्थलांतरीत मजुरांना घरी सुखरुप आणि सुरक्षित पोहचवण्यासाठी काही मागण्या केल्या आहेत. रेल्वेची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याच्या मंजुरीवर अवलंबून राहू नये, अशीही या याचिकेत मागणी करण्यात आली आहे. शिवाय आपल्या घरी शेकडो मैल अंतर कापत निघालेल्या मजुरांसाठी आश्रय गृह आणि जेवणाची सोय उपलब्ध करून देण्याचीही मागणी त्यांनी आपल्या याचिकेतून केली आहे.

याचबरोबर तिकीट प्रणालीच्या वापरासाठी एक समान मंच बनवला जावा, स्थलांतरीत मजुरांना घरी पोहचवण्यासाठी रेल्वेला राज्यांच्या परवानगीची गरज भासू नये, स्थलांतरीत मजुरांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावं आणि लॉकडाऊननंतर या मजुरांसाठी रोजगाराची व्यवस्था करावी अशा इतर महत्वाच्या मागण्याही त्यांनी याचिकेतून सर्वोच्च न्यायालयाला केल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment