मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी हनुमान जयंतीच्या दिवशी दिल्लीतल्या जहांगीरपूरमध्ये धार्मिक हिंसाचाराची घटना घडली. त्यानंतर अमरावतीच्या अचलपूर आणि परतवाडा या शहरात झेंडा लावण्यावरुन दोन गटात तुफान हाणामारी झाली. या घटना ताज्या असताना मुंबईमध्ये देखील अशीच एक हाणामारीची घटना समोर आली आहे. धार्मिक वादातून राजधानी मुंबईच्या आरे कॉलनीत काल रात्री वाद शिगेला पोहोचला आणि दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने हा वाद निवळला आणि त्या परिसरात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली.
मुंबईत यात्रेदरम्यान दोन गटात तुफान राडा pic.twitter.com/6bFTZTaENB
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) April 18, 2022
काय आहे नेमके प्रकरण ?
मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत आरे कॉलनीमध्ये गौतमनगर परिसरात काल संध्याकाळी शिव मंदिराच्या माध्यमातून एक कळस यात्रा काढण्यात आली होती. मात्र या कळस यात्रेदरम्यान रात्री आठच्या सुमारास दोन गटांमध्ये मोठा वाद झाला तसेच त्यांच्यात तुफान हाणामारीदेखील झाली. या हाणामारीत आठ ते दहा लोक जखमीसुद्धा झाले.
या हाणामारीत जखमी झालेल्यांना जवळच्या रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या हाणामारीची माहिती मिळताच आरे पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन या वादामध्ये मध्यस्थी केली आणि हा वाद मिटवला. या प्रकरणी आरे पोलिसांनी 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी काही आरोपींचा शोध आरे पोलीस घेत आहेत. या हाणामारीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्या गौतम नगर परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.