नगराळेंच्या अहवालात धक्कादायक खुलासानंतर परमबीर सिंह यांची ‘एनआयए’कडून चौकशी सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : तत्कालीन पोलीस सह आयुक्त (गुन्हे) यांचा सचिन वाझे यांच्या‌ नियुक्तीला विरोध असतानाही परमवीर सिंग यांनी त्यांची नियुक्ती केली, असा खुलासा मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह खात्याला पाठवलेल्या अहवालात म्हंटल आहे. नगराळे यांनी दिलेल्या अहवालानंतर अँटिलियाजवळ उभी करण्यात आलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी तपास करत असलेल्या एनआयएने परमबीर सिंग यांची चौकशी सुरू केली आहे. सध्या एनआयए सिंग यांची चौकशी करत असून लवकरच महत्वाची माहिती एनआयएच्या हाती लागेल.

याबाबत अधिक माहिती अशी कि, वाझे सर्वसाधारण पोलीस निरीक्षक असतानाही ते थेट परमवीर सिंग यांना रिपोर्ट करायचे. विविध हायप्रोफाईल प्रकरणांचा तपास परमवीर सिंग यांच्या सांगण्यानुसार वाझेंकडे‌ देण्यात आला होता, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सचिन वाझे यांच्या टीममधल्या व्यक्तींना त्यांच्या वरिष्ठांना रिपोर्टिंग करण्यास मनाई करण्यात आली होती. हायप्रोफाईल प्रकरणात‌ मंत्र्यांच्या ब्रीफिंगवेळी परमवीर सिंग यांच्याबरोबर सचिन वाझेसुद्धा हजर राहायचे. सरकारी गाड्या उपलब्ध असताना वाझे मर्सिडिज, ऑडी या वाहनांनी कार्यालयात यायचे, याकडे अहवालात लक्ष वेधले आहे. निलंबित पोलीस अधिकाऱ्याला परत सेवेत घेतल्यास अकार्यकारी पद देण्याचे संकेत आहेत. मात्र सचिन वाझेंना सेवेत घेऊन कार्यकारी पद दिल्यामुळे विरोध झाला होता. सचिन वाझे यांना सीआययूच्या प्रमुखपद देण्याालही विरोध झाला होता. सीआययूचे रिपोर्टिंग तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे असल्याची माहिती आहे.

सचिन वाझे प्रकरणात आतापर्यंत अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी झाली आहे. सचिन वाझे यांची कोठडी आज संपणार असल्यामुळे एनआयए त्यांची कोठडी वाढवण्यासाठी कोर्टात दाखल करण्यात येईल. दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओमध्ये ठेवलेल्या स्फोटकांचे प्रकरण तापल्यानंतर या प्रकरणात सचिन वाझे यांचे नाव समोर आले होते. तसेच यादरम्यान मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याने हे प्रकरण अधिकच तापले होते. त्यातच परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी केल्यावर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप केला होता. या आरोपामुळे अडचणीत सापडलेल्या अनिल देशमुख यांना अखेर गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

Leave a Comment