Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 5701

PM Cares Fund बाबत RTI अंतर्गत विचारलेल्या प्रश्नांना पंतप्रधान कार्यालयाकडून केराची टोपली

मुंबई । PM Cares Fundबाबत विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असतानाच या फंडाबाबत माहिती अधिकार कायद्यांतर्गतही माहिती दिली जात नसल्याचं समोर आलं आहे.मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी पीएम केअर फंडाबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे माहिती मागवली होती. मात्र त्यांना ही माहिती देण्यात आली नाही. कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी पीएम केअर फंडाची निर्मिती करण्यात आली आहे. या फंडात जमा होणारी रक्कम कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी वापरली जाईल असे अपेक्षित आहे. या फंडात आतापर्यंत अनेक बड्या उद्योगपतींपासून, ते सरकारी कंपन्यांनी आणि सामान्य जनतेनंही कोट्यवधी रुपयांचं योगदान दिलं आहे.

अगदी लहान मुलांनी आपल्या खाऊसाठी, खेळण्यांसाठी साठवलेले पैसेही पीएम केअर फंडाला दिले आहेत. या फंडाभोवती वादाची वर्तुळंही पाहायला मिळाली. राज्यातील भाजपच्या खासदार, आमदारांनीही या फंडात मदत दिली होती. शिवाय इतरांनाही मदत त्यात मदतरुपी योगदान देण्याचं आवाहन केलं होतं. पीएम केअर्स फंडअंतर्गत आतापर्यंत किती निधी गोळा झाला, तो निशी किती कुठे आणि कसा खर्च होणार याबाबत अजूनही माहिती समोर आली नसल्यानं या फंडाच्या वैधतेबाबत अनेक प्रश्नचिन्ह तयार झालं आहे. दरम्यान, याचाच धागा पकडत माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी या फंडाबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे चार प्रकारची माहिती मागवली होती. यामध्ये…

1) पीएम केअर्सफंडात निधी दिलेल्या टॉप २० दात्यांची नावं काय ?

2) पीएम केअर्स फंडात आतापर्यंत किती रक्कम जमा झाली ?

3) पीएम केअर्स फंडातून खर्च केलेल्या रकमेचा तपशील ?

4) पीएम केअर्स फंडावर पंतप्रधानांनी नियुक्त केलेल्या 3 ट्रेस्टींची नावं ?

माहिती अधिकार कायद्यांतर्गत विचारलेल्या या प्रश्नांबद्दल पंतप्रधान कार्यालयाकडून माहिती देण्यात आलेली नाही.

सातारा जिल्ह्यात आज १८ नवीन कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या ५९७ वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्हयातील अठरा जणांचे रिपोर्ट कोविड बाधित आले आहेत. यातील मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या गुरसाळे गावठाण ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुषाचा घरीच मृत्यु झाला होता. या पुरुषाचा मृत्यु पश्चात रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

ताज्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकुण कोरोना रुग्णांची संख्या ५९७ वर पोहोचली आहे. तर कोरिनामुळे मृत्यू झालेल्यांची जिल्ह्यातील एकुण संख्या २५ वर पोहोचली आहे.

बाधित रुग्णांमध्ये खटाव तालुक्यातील साठेवाडी येथील 76 वर्षीय महिला, गुरसाळे गावठाण येथील 75 वर्षीय पुरुष
(मृत)

खंडाळा तालुक्यातील अर्बन सिटी धनगरवाडी 50 वर्षीय महिला

सातारा तालुक्यातील समर्थनगर, सातारा येथील 19 वर्षीय युवक, करंडी येथील 25 वर्षीय महिला

कराड तालुक्यातील वानरवाडी येथील 70 वर्षीय महिला, 17 वर्षीय युवती

फलटण तालुक्यातील जोरगाव येथील 25 वर्षीय महिला, 21 वर्षीय युवक व 12 वर्षांचा मुलगा, कोळकी येथील
25 वर्षीय पुरुष व 50 वर्षीय महिला.

जावली तालुक्यातील प्रभूचीवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, कावडी येथील 15 वर्षाचा मुलगा, 58 वर्षीय पुरुष,
47 वर्षीय पुरुष व 18 वर्षीय युवक.

माण तालुक्यातील वडजल येथील 55 वर्षीय पुरुष

175 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
तसेच एन.सी.सी.एस. पुणे यांनी 175 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचेही कळविले आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सोन्याचे भाव पडले; ‘या’ कारणाने सोन झालं स्वस्त

मुंबई । अमेरिकेतील रोजगाराची आकडेवारी आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज कमॉडिटी बाजारात सोन्याच्या किमतींवर परिणाम झाला. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) सोन्याचा दरात ०.६६ टक्क्यांची घट झाली. सोने १० ग्रॅमला ४६३९० रुपये झाले आहे. चांदीचा भाव ०.६९ टक्क्यांनी कमी झाला असून प्रती किलो ४८४७४ रुपये झाला आहे.

येत्या काही सत्रात सोन्याचा भाव ४५९०० ते ४६९०० च्या दरम्यान राहील, असा अंदाज एसएमसी सिक्युरिटीजने व्यक्त केला आहे. चांदीचा भाव ४८००० आसपास राहणार असून तो ४९३०० पर्यंत जाऊ शकतो, असे या अहवालात म्हटलं आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात आज सोन्याचा भाव प्रती औंस १७२० डॉलरच्या दरम्यान आहे. चांदीचा भाव १८.१८ डॉलर प्रती औंस राहिला. युरोपातील केंद्रीय बँकांकडून किमान ५०० अब्ज युरोचे आर्थिक पॅकेज घोषीत केले जाईल, असा अंदाज कमॉडिटी विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सोने चांदीवर परिमाण होण्याची शक्यता आहे.

सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित असल्याच्या भावनेने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. त्यातच २०१९ आणि २०२० या वर्षात मे महिन्यापर्यंत सोन्याने चांगली कामगिरी केल्याने गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. सोन्याला २०११ नंतर प्रथमच अच्छे दिन प्राप्त झाल्याचे दिसून आले आहे. गोल्ड ईटीएफला मिळणाऱ्या पसंतीच्या पार्श्वभूमीवर एप्रिल२०२० अखेरीस या फंडांतील एकूण निधी ९,१९८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

बीडमध्ये कोरोनाच्या भीतीमुळे 65 वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

बीड । संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत आहे. वृत्तवाहिन्या, स्मार्ट फोन वर येणाऱ्या कोरोना संबंधीच्या बातम्या यातून काही जण सतर्क होत आहेत तर काही भयग्रस्त होत आहेत. लोकांच्या मनात कोरोनाची भीती निर्माण होण्याचं दुसरं कारण म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह झाल्यास सामाजिक बहिष्कार होण्याची भीती. त्यातून अनेकांच्या मनात या कोरोनाविषयीचा भयगंड निर्माण झाला आहे. अशातच कोरोनाला घाबरुन एका 65 वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यातील मंगेवाडी येथे हा खळबळजनक प्रकार घडला आहे. ‘मी कोरोनाच्या भीतीमुळे फाशी घेत आहे.’ , अशी सुसाईड नोट लिहून आसाराम रामकिसन पोटे (वय ६५) या वृद्धाने आत्महत्या केली आहे.

आसाराम पोटे यांना कुठलाही आजार नव्हता. तसेच त्यांनी गेल्या काही दिवसांत कुठेही प्रवास केलेला नव्हता. एवढचं काय तर ते कोणत्याही नवीन व्यक्तीच्या संपर्कातही आले नव्हते. केवळ कोरोनाविषयी बाहेर चर्चा ऐकून आणि सद्य परिस्थिती पाहून त्यांनी आपल्या शेतात एका झाडाला गळफास लावून चक्क आपलं आयुष्य संपवलं. आत्महत्येपूर्वी आसाराम यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमधूनच ही बाब समोर आली आहे.

आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी आसाराम यांनी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली. ‘मी कोरोनाच्या भीतीमुळे फाशी घेत आहे. यामध्ये कोणाचाही दोष नाही’, असं त्यांनी या चिठ्ठीत लिहिलं होतं. त्यामुळे त्यांनी केवळ कोरोनाच्या भीतीपोटी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान या घटनेविषयी शहादेव पोटे यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर घटनेचं वृत्त संपूर्ण तालुक्यात पसरलं असून त्यामुळे भीतीचं वातावरणं निर्माण झालं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत एकाच दिवसात झाली मोठी वाढ

नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या Unlock 1 धोरणातंर्गत शुक्रवारपासून देशातील अनेक व्यवहार पुन्हा सुरु होत असतानाचा कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला नाही आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ९८५१ नवे रुग्ण आढळून आले. तर २७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोना रुग्णांच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे आता देशात प्रत्येक दिवशी तब्बल १० हजार नव्या रुग्णांची भर पडत आहे. ही परिस्थिती धडकी भरवणार आहे.

आतापर्यंत कोरोनातून लाखभरापेक्षा अधिक लोक बरे झाले असले तरी नव्या रुग्णांची झपाट्याने वाढणार संख्या मोठी अडचण निर्माण करु शकते. मुंबईसारख्या शहरांमध्ये रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे आतापासूनच रुग्णालये आणि कोविड सेंटरमध्ये बेडसचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वेग असाच राहिल्यास आरोग्य यंत्रणा अपुरी पडण्याची शक्यता आहे.

देशातील अनेक तज्ज्ञांनी जून आणि जुलै महिन्यात देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली होती. ही भीती आता खरी ठरताना दिसत आहे. महाराष्ट्र हे देशातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेले राज्य आहे. मुंबई हा राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. मुंबईतील एकूण रुग्णांचा आकडा ४२ हजारांच्या पलीकडे गेला असला तरी १७,२१३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या उपचार घेत असलेले २३,४०५ (अ‍ॅक्टिव्ह) रुग्ण आहेत. रुग्णसंख्येत धारावीचा वरचा क्रमांक असला तरी उपचाराखाली असलेल्या बाधित रुग्णांची संख्या शीव, वडाळा, कुर्ला, भायखळा आणि अंधेरी परिसरात अधिक आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

निसर्ग चक्रीवादळानंतर मुख्यमंत्री ठाकरे ऑन फिल्ड; मोठी घोषणा करण्याची शक्यता

मुंबई । निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या किनारीपट्टयाला मोठा फटका बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी यासंबंधी व्हिडीओ कॉन्फेरंसिंग द्वारा आढावा घेतला होता. त्यानंतर आता ठाकरे थेट फिल्डवर उतरले असून आज ते रायगड जिल्ह्याची पाहणी करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे एखादी मोठी घोषणा करू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

निसर्ग वादळाने रायगड जिल्हा हादरून गेला आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांत वादळामुळे मोठी हानी झाली आहे. जिल्ह्यात सुमारे ५ लाख घरांची पडझड झाली असून ५ हजार हेक्टरवरील कृषीक्षेत्राला फटका बसला आहे. जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली असून ८ तालुक्यांत वीज यंत्रणा व दूरध्वनी यंत्रणा पूर्णपणे ठप्प आहे. किमान १७०० गावे दोन दिवस अंधारात आहेत. जिल्ह्यातील अनेक रस्ते अजूनही बंद आहेत. या स्थितीचा गुरुवारीच आढावा घेऊन आवश्यकते निर्देश दिल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे आज प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत.

दरम्यान, निसर्ग चक्रीवादळ धडकल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत सादर करावेत, म्हणजे शेतकरी व गावकऱ्यांना तातडीने मदत करता येईल. विशेषत: रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब पडले असून, महावितरणने तातडीने वीजपुरवठा सुरू करावा व प्रसंगी त्यासाठी इतर ठिकाणाहून जास्तीचे मनुष्यबळ, साधन सामग्री उपलब्ध करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारीच दिले आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे आज सकाळी ११.३० वाजता मुंबईतून बोटीने रायगड जिल्ह्यात जाणार आहेत. गोल्डन गेट ते मांडवा जेटी असा प्रवास मुख्यमंत्री बोटीने करतील. तिथून मोटारीने ते अलिबागमधील थळ येथे पोहचतील. तेथीन नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी अलिबाग येथील जिल्हा मुख्यालयात सर्व संबंधित प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मुख्यमंत्री आढावा घेतील, असे सांगण्यात आले.

वैद्यकीय विदयार्थ्यांच्या परीक्षा १५ जुलैनंतर; अमित देशमुखांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई । राज्यात संचारबंदीमुळे सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. गेले अनेक दिवस विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा मुद्दा ऐरणीवर होता. या संबंधित शासनाने अंतिम निर्णय हा परीक्षा न घेता मागील एकूण गुणांवरून मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्या लागणार आहेत. या विदयार्थ्यांच्या परीक्षा १५ जुलैनंतर होतील हे आता निश्चित झाले आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी राज्यपालांकडून तशी परवानगी घेतली आहे.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवी तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या उन्हाळी परीक्षेचा आराखडा त्यांच्यासमोर सादर केला. यामध्ये या परीक्षा १५ जुलै नंतर घेण्यात येतील असे सांगण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या आराखड्याला मान्यता दिली आहे.

दरम्यान  आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता १५ जुलै नंतर घेतल्या जाणार असल्याची खात्री झाली आहे. या विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर विदयार्थ्यांना तशी माहिती देण्यात आली आहे. राज्यातील संचारबंदी बद्दल काही सांगता येणार नसले तरी सामाजिक अलगाव चे नियम पाळून या परीक्षा घेतल्या जाण्याची शक्यता आहे.

तबलिगी जमातीला भारत सरकारचा दणका; निजामुद्दीन मरकजला उपस्थिती लावलेल्या २,२०० जणांना आता भारतात नो एन्ट्री

वृत्तसंस्था । कोरोना विषाणू संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात तबलिगी जमातीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. देशभरातून यावर प्रतिक्रिया व्यक्त कऱण्यात आल्या होत्या. आता सरकारने तबलिगी जमातीत असणाऱ्या २,२०० परदेशी नागरिकांना पुढचे दहा वर्षे भारतात येण्यास बंदी घातली आहे. तबलिगी जमातीच्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा समावेश असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. पुढचे दहा वर्षे कोणत्याही कारणाने ते भारतात येऊ शकणार नाहीत. त्यांचा व्हिसा मंजूर केला जाणार नाही अशी माहिती शासकीय सूत्रांकडून मिळाली आहे.

यावर्षीच्या एप्रिल महिन्यात तबलिगी जमातीच्या क्रियाकल्पामध्ये समावेश असणाऱ्या व्हिसा च्या नियमांचे उल्लंघन केलेल्या ९६० परदेशी नागरिकांवर केंद्रीय गृह मंत्रालयाने बंदी घातली होती. तशी माहिती गृहमंत्रालयाने दिली होती. या लोकांनी दिल्लीतील निजामुद्दीन मरकज ला उपस्थिती लावली होती. तसेच देशात कोरोना संक्रमणामध्ये या जमातीचा महत्वाचा भाग असल्याचे सरकारने सांगितले होते. त्यानंतर याच्याशी संबंधित २,१०० परदेशी नागरिक १ जानेवारीपासून भारतात येऊन गेल्याचे सांगण्यात आले होते. त्यातील ८२४ नागरिक देशाच्या विविध भागात गेले होते. २१६ निजामुद्दीन मरकज मध्ये राहिले होते आणि बाकीचे संचारबंदीच्या आधी भारताबाहेर गेले होते.

https://twitter.com/ani_digital/status/1268514657104302082  

मोठ्या संख्येने हे लोक देशाच्या वेगवेगळ्या भागात गेले होते. ८२४ लोकांची माहिती २५ मार्च ला सरकारला देण्यात आली होती. २८ आणि २९ मार्च सर्व राज्यांमध्ये या लोकांना शोधण्याची सूचना जरी करण्यात आली होती. नंतर त्यांची तपासणी करून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. देशभर या लोकांच्या क्रियांवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले होते. आता सरकारने या जमातीशी संबंधित या परदेशी नागरिकांना देशात  येण्यासच  बंदी घातली आहे.

प्रिय कोरोना, आज जागतिक पर्यावरण दिवस बरं का..!!

पर्यावरण दिन विशेष | डॉ. व्ही. एन. शिंदे (कोल्हापूर)

पाच जून हा दिवस आपण ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा करतो. याच पर्यावरणाचे आपण किती आणि कसे नुकसान करत आहोत, हे मागील तीन महिन्यापासून, कोरोना आल्यापासून आपणास सातत्याने जाणवत आहे. तरीही कोरोनाच्या परिणामापासून मुक्ती मिळणे आवश्यक आहे. एकिकडे ‘निसर्ग’ वादळ मानवी जिविताचे नुकसान न करता जाते. मानवावर दया दाखवते. तर दुसरीकडे केरळमध्ये मानवातील दानव एका हत्तीणीची क्रुरपणे हत्या करताे. या पार्श्वभूमीवर ‘कोरोना’ला लिहिलेले पत्र आपणासाठी…!!

प्रिय (!,?) कोरोनास,

सप्रेम नमस्कार विनंती विशेष.
तू आल्यापासून निसर्ग आणि मानवी जीवन पूर्णत: बदलले आहे. तू आमच्या निसर्गाप्रती असणाऱ्या सर्व चुकांचा आरसा दाखवत आहेस. मात्र तू करत असलेल्या जिवित आणि आर्थिक नुकसानीमुळे आमच्या मनात तुझ्याबद्दल भयानक राग आहे. खरे तर, तुझ्या येण्यामुळे आमच्या हातून निसर्गाप्रती घडलेल्या चुका ठळकपणे दिसू लागल्या आहेत. पण माझ्यासारख्यांची फार मोठी अडचण आहे. आता हेच बघ ना. तुला पत्र लिहिताना मी नेहमीप्रमाणे ‘प्रिय’ असे लिहिले. मात्र त्यानंतर कंसात दोन चिन्हे लिहावी लागली. दुसऱ्यांच्या पत्रात काय आहे, हे जाणून घ्यायची माणसाला हौस असते. ‘आपलं ठेवायचं झाकून अन्…’ हा जणू आमचा स्थायीभाव बनलाय. त्यामुळे तुला लिहिलेले पत्र अनेक जण वाचणार. म्हणूनच जे वाचतील, त्यांच्या मनातील भावना व्यक्त करणारी ही दोन चिन्हे. तुला ‘प्रिय’ लिहिले, हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटेल. त्यांच्यासाठी उद्गारवाचक चिन्ह. तुला मी ‘प्रिय’ कसा काय म्हणू शकतो, हा अनेकांना प्रश्न पडेल. त्यांच्या दृष्टीने हा वेडेपणा आहे. म्हणून प्रश्नचिन्ह. तसाही मी वेडाच आहे, म्हणूनच तुला पत्र लिहू शकतो. अनेक जण मला ‘वेडा’ म्हणतात. विज्ञानातला न्यूटनचा तिसरा नियम लक्षात न ठेवणारे आम्ही ‘जशास तसे’ वागतो. मी मात्र ‘न केलेल्या पापाचे माप’ माझ्या पदरात टाकणारांचाही ऋणी राहतो. त्यांच्या त्या कृतीने मला काही ना काही चांगले शिकवलेले असते, म्हणून त्यांचा तिरस्कार करत नाही. असे वागणारा माणूस आमच्या दुनियेत वेडाच ठरतो. तू तर इतके काही शिकवलेस की तुझा तिरस्कार करणे कसे शक्य आहे? म्हणूनच तुला ‘प्रिय’ म्हटले. उगाच तुझाही गैरसमज व्हायला नको, म्हणून नमनालाच हे स्पष्टीकरण.

कोरोना, तू आलास आणि बघता बघता सारे जग बदलले. जगात सर्व काही प्रथमच थांबले. सर्वजण घरात
कोंडले. यंत्रांचा खडखडाट थांबला. पक्ष्याकडे बघून आकाशात उडण्यासाठी आम्ही विमान बनवले. पक्ष्यापेक्षांही उंच उडणाऱ्या त्या विमानांची घरघर थांबली. धूर ओकणारे कारखाने बंद झाले. कामगारांचे हात थांबले. रेल्वे, गाड्या थांबल्या. नद्यांना प्रदूषित करणारी कारखान्यांची पाईपलाईन प्रथमच कोरडी झाली. सारे काही थांबले. हे आम्हीच थांबवले. औरंगजेबाच्या सैनिकांनी संताजी, धनाजीचा घेतला नसेल इतका धसका आम्ही तुझा घेतला. तू दिसत नाहीस, तरीही आम्ही तुला घाबरून सारे काही थांबवले. हे शक्य झालं ते सुद्धा आम्ही विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळेच. आम्ही पटकन सावध झालो आणि तुला भिऊन आम्ही घरात कोंडून घेतले. त्यामुळे जिवितहानीचे अपेक्षेएवढे नुकसान तुला करता आले नाही. पण आर्थ‍िक नुकसान जे केलेस तेही मोठे आहे. जे गेलेत ते जीवही कमी नाहीत. पण दर वर्षी रस्ते अपघातात साडेतेरा लाख लोकांचे प्राण जायचे. दोन ते पाच कोटी लोक कायम किंवा तात्पुरते अपंग बनायचे. प्रत्येक २४ सेकंदाला एक जीव जायचा. ‘वाहतुकीचे नियम पाळले नाहीत, तर अपघातात जीव जाउ

शकतो’ हे आम्हाला माहित आहे. नियम न पाळल्यानेच बहुतांश अपघात घडायचे. तरीही आम्ही नियम मोडायचो, अपघात व्हायचे. मात्र तू जीव घेऊ शकतोस, हे लक्षात येताच आम्ही वाहने लॉक केली आणि अपघातात जाणारे अनेक जीव वाचले. तू घेतलेल्या जीवांनी जणू त्याची भरपाई केली. पण तरीही तुझ्यामुळे झालेले नुकसान कमी, याचा आनंद मानायचा; की तू आम्हाला घरात कोंडून टाकलेस, अनेकांचे जीव घेतलेस, त्याचे दु:ख? काहीच कळत नाही.

आम्ही उत्सवप्रिय. लग्न असो किंवा यश. आम्हाला ते उत्सवाच्या स्वरूपात साजरे करायचे असते. त्यासाठी

खर्चाची आम्हाला पर्वाच नव्हती. ‘ऋण काढा, पण, सण साजरा करा’ हा जणू आमचा मूलमंत्र बनला होता. आकाशात लग्न, समुद्रात लग्न ‘डेस्टिनेशन वेडिंग’ ही संस्कृती रूजू लागली होती. जागतिकीकरणानंतर मध्यमवर्गातही हे सारे रुजू लागले होते. तर दुसरीकडे आपल्या वडिलांकडे लग्नाचा खर्च उचलण्याइतके पैसे नाहीत, म्हणून काही युवती आत्महत्या करू लागल्या होत्या. लग्नाचा खर्च अनावश्यक आहे, हे आम्हाला कळते. पण खोट्या प्रतिष्ठेपायी, आम्ही ते करत होतो. मात्र तुझ्या येण्याने आमच्या उत्सवप्रियतेवरच घाला घातला आहेस. आता पंधरा-वीस लोकांच्या उपस्थितीत लग्न लागू लागले आहे. लग्नातील अनावश्यक खर्च टाळला जायला लागला आहे. मात्र यानिमित्ताने वापरले जाणारे हारतुरे, गुच्छ हे सारे काही बंद झाले. जेवणावळी थांबल्या. मोठमोठे मंडप घालणे बंद झाले. मंदिरे बंद झाली. आज देवही कुलुपात बंद झाले आहेत. देवाला केले जाणारे दानही थांबले. तेथे वापरली जाणारी फुले शेतातच सडली जाऊ लागली. नाईलाजाने शेतकरी फुलांची शेती नांगरून टाकत आहे. ज्या देवासाठी त्यातील अनेक फुले वापरली जात असत, ते देवही आज तुझे संकट टाळण्यासाठी येत नाहीत. लग्न आणि उत्सवातील अनावश्यक खर्चाचा भार कमी झाला, लग्नपद्धती बदलत आहे, याचा आनंद मानायचा, की शेतकऱ्याला आपली बहरलेली फुलशेती नांगरावी लागते, याचे दु:ख?

तुझ्या आगमनाने आमची शिक्षण पद्धतीही बदलली आहे. ‘चॉक आणि टॉक’ संस्कृती बदलण्यास तयार नसलेले, आम्ही आता ‘ऑनलाईन’ व्याख्याने देऊ लागलो आहोत. उच्च शिक्षणच नाही, तर, माध्यमिक शिक्षणातही ही संस्कृती रुजू लागली आहे. हे मोठ्यासाठी ठिक झाले. पण शाळेतील मुलांचा किलबिलाट थांबला आहे. महाविद्यालयातील तरूणाईने बहरलेले चैतन्यमय वातावरण नाहीसे झाले आहे. आता कार्यशाळा, चर्चासत्रेही ‘वेबीनार’च्या रूपात होऊ लागली आहेत. एवढेच काय, आज ‘फॅकल्टी इंप्रुव्हमेंट प्रोग्राम’ही असेच ‘ऑनलाईन’ होऊ लागले आहेत. पण सुरुवातीला मोफत असणाऱ्या या वेबीनारसाठी आता शुल्क आकारले जाऊ लागले आहे. चार-पाच दिवसात सूचना काढायची. वक्ते ठरवायचे. त्यांनी होकार देताच, एक फलक तयार करून तो ‘व्हॉटसअप’च्या माध्यमातून सर्वत्र पसरवायचा आणि त्यातून ‘ऑनलाईन पेमेंट’ घेऊन वेबीनार आयोजित करायची. अशी वेबीनार जणू नव्या धंद्याचे रूप घेत आहेत का? अशी शंका यावी, इतपत हे एक-दोन महिन्यातच बदलू लागले आहे. हे सुरू असताना काही मंडळी घरातील वस्त्रावर असतात. काहीजण व्याख्यानाने मन तृप्त करून घ्यावयाच्या वेळेत, आपल्या जिव्हेला तृप्त करत असतात. त्यांच्यामागे इतरांची हालचाल सुरू असते. यामुळे या व्याख्यानांचे गांभिर्य कमी होत आहे. मात्र या नव्या संस्कृतीमुळे प्रवास टळला आहे. त्यामुळे गाड्यांचा वापर होत नाही. प्रदुषण, कर्ब उत्सर्जन कमी होत आहे. या सर्व परिस्थितीत गाड्यांचा वापर कमी झाला, आमची शिक्षण संस्कृती आधुनिक तंत्रज्ञान वापरू लागली याचा आनंद मानायचा की शिक्षणाचे गांभिर्य संपत चालले, मुलांचा किलबिलाट थांबला, महाविद्यालयातील चैतन्याने भारलेले वातावरण लुप्त झाल्याचे दु:ख?
या पूर्वी तुझ्या पूर्वजांनी अनेकदा मानवावर हल्ले केले. मोठ्या प्रमाणात बळी घेतले. सहाव्या शतकातील ‘जस्टिनाईनचा प्लेग’ ही यातील सर्वात मोठी नोंद. जस्टिनाईनच्या सम्राटाने इजिप्तचा भूभाग जिंकला. त्याला नजराणा म्हणून पाठवलेल्या धान्यासोबत काळे उंदीर आणि प्लेग निर्माण करणाऱ्या पिसवा गेल्या. त्यातून सहा कोटी लोकांचा जीव घेणारा प्लेग पसरला. बळींची संख्या त्यावेळच्या जगाच्या लोकसंख्येच्या पंचवीस टक्के होती. हे बळी प्लेगने घेतले, की मानवाच्या साम्राज्य वाढवण्याच्या हव्यासाने, की सामर्थ्यशाली राजाला खुश करण्यासाठी नजराणे देणाऱ्या लाचारांनी? कोणामुळेही असो. त्यावेळीही गेले ते गरीबच. पुन्हा चौदाव्या शतकात ‘द ब्लॅक डेथ प्लेग’ पसरला. त्याने जगातील एक तृतीयांश लोकसंख्या संपवली. वीस कोटी लोकांचा मृत्यू झाला. या साथीने अनेक वर्षांपासूनचे फ्रांस आणि इंग्लंडचे युद्ध संपवले. ब्रिटनमधील सरंजामी व्यवस्था पूर्णपणे संपून गेली. ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नव्हता त्यांच्या राजधानीत, लंडनमध्ये मात्र हा प्लेग तीनशे वर्षे अधूनमधून त्रास देत होता. हे कलह, अनिष्ट प्रथा संपवल्याचा आनंद मानावा, की वीस कोटी लोकांच्या मृत्यूचे दु:ख?
मात्र, आम्ही हुशार. प्लेग माणसाच्या संपर्कात आल्याने होतो, हे आमच्या लक्षात आले. व्हेनिस राज्यातील ‘रागूसा’ शहरात नवी पद्धत सुरू केली. इतर देशाची येणारी जहाजे आम्ही बंदरातच तीस दिवस नांगरून ठेवायचो. त्यातील कोणी आजारी नाही पडले, तरच त्यांना शहरात प्रवेश दिला जायचा. ही क्वारेंटाईन करण्याची मानवी इतिहासातील पहिली वेळ. हा शब्द आम्ही इटलीतून घेतला. आम्ही तुझ्या त्या पूर्वजाला, प्लेगला नामशेष केले. त्याने फार दमवले, पण आम्ही त्याला संपवले. तो संपला या आनंदात त्यापासून काहीच न शिकता पुढे तसेच वागू लागलो.

वेळोवेळी सावध करायला तुझे अनेक भाऊबंद आले. त्यांनी आम्हाला सतावले. भरपूर त्रास दिला. अनेक लोकांचे जीव घेतले. देवी, इबोला, एन्फ्ल्यूएंझा, कांजिण्या, चिकनगुनिया, टॉयफॉईड, डांग्या खोकला, डेंग्यू, देवी, धनुर्वात, नारू, मलेरिया, कॉलरा, पोलिओ, प्लेग, कुष्ठरोग, क्षय असे किती सांगावेत? प्रत्येकावर आम्ही मात करत चाललो. ज्यांनी या आजारावर मात करण्याचे उपाय शोधले, मग ते लुई पाश्चर असोत किंवा देवीवरची लस शोधणारे एडवर्ड जेन्नर. आम्ही त्यांना महामानव ठरवले. तरिही तू, वेगवेगळ्या रूपात आम्हाला सावध करण्यासाठी येत राहिलास. आम्हाला सावध करायचा प्रयत्न केला. पाठोपाठ कोणी ना कोणी महामानव तयार झाला. आम्ही तुझ्या त्या रूपावर मात केली. आम्ही सर्वश्रेष्ठ याचा गर्व बाळगत राहिलो. तू पुन्हा पुन्हा रूप बदलत आलास… तसाच आताही तू आलास.
तू भयंकर विनाश करणार, हे आम्ही ओळखले. आम्ही क्वारेंटाईन झालो. तुझा उघड सामना आम्ही आज तरी करू शकत नाही. आमच्या नियमाप्रमाणे आम्ही आमची लाज वाटते म्हणून तोंड झाकून घेतले आहे, असे तुला वाटते. खरंय ते. पण आमच्यातील अनेकांना आजही आपल्या कृत्याची, आम्ही निसर्गाशी केलेल्या क्रूर वर्तनाची लाज वाटत नाही. त्यांनी केवळ तुझ्या भितीने तोंड झाकले आहे. आम्हाला खरंतर जगायला काय लागते? शुद्ध हवा, शुद्ध पाणी, चांगले अन्न आणि उन, वारा पाऊस यापासून वाचण्यासाठी निवारा. मात्र आम्ही प्राणीधर्म विसरलो. आम्हाला स्वार्थाने आंधळे केले. मेल्यानंतर पाच बाय चार फुटाची जागा पुरते. मात्र जिवंतपणी टोलेजंग घर बांधू लागलो. त्यासाठी मोठी वृक्षतोड करत राहिलो. आम्ही गरजेपेक्षा जास्त ओरबडत राहिलो. ‘माझेही माझेच आणि तुझेही माझेच,’ असे वागत राहिलो. ज्यांनी आम्हाला आसरा दिला. आमच्या संस्कृतीचा विकास करायला मदत केली. त्या नद्या आम्ही संपवल्या. गंगेपासून पंचगंगेपर्यत ही समस्या वाढवली. जिवनदायिन्या मृत्यूदायिन्या बनवल्या. पाण्याचे साठे खराब केले. तेलाचे, खनिजांचे अमर्याद साठे उपसले. त्यांना जाळून हवेचे प्रदूषण केले. आमची प्रगती मोजण्यासाठी ‘ऊर्जेचा आधिक वापर’ हे परिमाण वापरू लागलो. प्रत्येक देश ऊर्जेचा वापर वाढवत गेला. त्यातून वायूचे प्रदूषण वाढवले. परिणामी, आमच्यापासून पंधरा किलोमीटरपेक्षा जास्त उंचावरील ओझोनच्या थराला धोका निर्माण केला. तो थर संपला तर सूर्याच्या अतिनील किरणांनी आम्ही भाजून जाऊ. तरीही आम्ही ऊर्जेचा वापर वाढवतच गेलो.
शेती, सिमेंटची जंगले, कारखाने उभारण्यासाठी आम्ही जंगलांची कत्तल केली. झाडांनी दिलेल्या ऑक्सिजनशिवाय आम्ही जगू शकत नाही. झाडे ही पावसाची ‘एटीएम’ यंत्र आहेत. झाडाशिवाय पाऊस पडू शकत नाही. झाडामुळे जमिनीची धूप कमी होते, हे ठावूक असूनही आम्ही झाडे तोडत राहिलो. मी तोडले म्हणून काय फरक पडतो? असा प्रत्येकांचा विचार. झाडेच राहिली नाहीत, तर ऑक्सिजन कोठून येणार? याचा विचार आम्ही एकविसाव्या शतकातही करत नाही. हेच आमच चुकतंय. आम्हाला ते कळतंय, पण वळत नाही. पर्यटनस्थळी जायची आम्हाला फार हौस. संधी मिळाली की जातो. मात्र, त्या सुंदर ठिकाणावरून परतताना सर्वत्र अस्वच्छता पसरवतो. समुद्राच्या किनारे, तलाव, जंगल… जे जे सुंदर आहे, ते आम्हाला उपभोगायचे आहे… तो आम्ही आमचा हक्क मानतो. पण ते सुंदर ठेवण्याची जबाबदारी आम्ही नाकारतो. जंगलातील, समुद्रकिनाऱ्यावरील असणाऱ्या प्राण्यांचे जीवन नष्ट करत आम्ही आमची प्रगती केली. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे’ ही विंदांची शिकवण आम्ही शब्दश: घेतली. देणाऱ्या निसर्गाचे हातही आम्ही ओरबाडून घेतले. विंदाना अपेक्षित दानशूरपणाचा गुण घेतलाच नाही. उलट चीनच्याच माओ जेडोंग या हुकूमशहाने चिमण्या धान्याचे नुकसान करतात, म्हणून सारा देश चिमण्यामुक्त केला. मग पिकावर कीड आणि अळ्यांनी हल्ला केला. धान्याचे उत्पादन घटले. निसर्गावरचा हल्ला किती महाग पडू शकतो हे आम्ही अनुभवले. तरीही शिकलो मात्र शून्य. त्याचेच फळ आज आम्ही भोगतो आहोत.

शाकाहारी माणसे तोंडाने पाणी पितात. मांसाहारी प्राणी जिभेने पाणी पितात. यावरून आमचे शरीर खरे तर शाकाहारासाठी बनलेले आहे. आम्ही वनस्पती खायच्या. त्या वाढवायच्या. पण आम्ही मांसाहार सुरू केला. दुधदुभत्यासाठी पाळलेल्या मेंढ्यापासून सुरुवातीला लोकर मिळवली आणि नंतर मांस खायला मारू लागलो. शेळ्यांचा वापरही तसाच सुरू केला. उपयोगाचे आहेत तोपर्यंत प्राण्यांचे अन्य फायदे घेतो आणि ते बंद झाले की त्यांना मारून मांस खातो. कोंबड्यांची अंडी पुनरूत्पादनासाठी नव्हे, तर आमच्या जिव्हेचे चोचले पुरवण्यासाठी असे मानत खाऊ लागलो. ते कमी पडू नयेत म्हणून आम्ही संकरित वाण तयार करू लागलो. ते कमी पडू लागले म्हणून कुत्र्या-मांजरापासून वटवाघळापर्यंत सर्व प्राणी खायला सुरुवात केली. वाघ खायला नाही तर बसायला व्याघ्रासन हवे म्हणून मारले. कोणाची शिकार करायचे बाकी ठेवले नाही आम्ही. ज्यांचा आम्हाला त्रास होतो, तो प्रत्येक जीव आम्ही नष्ट करायचा नतद्रष्टपणा करतो. त्याच्या परिणामांचा आम्ही विचारच केला नाही. तू आणि तुझ्या पूर्वजांनी वारंवार इशारे दिले, पण आम्ही गर्वाच्या शिखरावर बसलो. ‘आम्हीच सर्वश्रेष्ठ’ असा गर्व झाला आम्हाला. भ्रमात राहिलो की आमचे कोणीच काही बिघडवू शकत नाही. पण तू आलास आणि वाघाला न घाबरणारे आम्ही, तू न दिसताही तुला घाबरलो. इतके घाबरलो की कोणाजवळ जायचे झाले तरी तुझ्या भितीने मन जाऊ देत नाही. भाजी घेताना मनात शंका; धान्य घेताना, औषध घेतानाही भिती वाटू लागली तुझी. तुझ्या धाकाने का होईना आम्ही घरात बसलो आणि…
माणसांच्या गर्दीने फुललेली ठिकाणे आता ओस पडली आहेत. गर्दीने भरलेले मोकळे रस्ते भयाण भासू लागले आहेत. गाड्यांचा आवाज नाही. हॉर्नचा आवाज नाही. सर्वत्र स्मशान शांतता भासू लागली आहे. आकाशात चंद्र आहे, चांदण्या आहेत, मंद वारा आहे, फुललेल्या रातराणीचा गंध आहे, पण सारे नि:शब्द आहे. ही शांतता मनाला अस्वस्थ करते. आम्हाला सवयच नाही, तुझा नि:शब्द शांततेत आनंद घ्यायची. पण आम्ही ज्यांना त्रास देतो, ते पक्षी मुक्तपणे निसर्गात विहार करत आहेत. त्यांना आता आमची भिती वाटत नाही. झाडांच्या जंगलातील प्राणी सिमेंटच्या जंगलात निर्धास्तपणे वावरू लागले आहेत. गाणारे पक्षी कित्येक वर्षानंतर ऐकायला मिळाले. खाडीत फ्लेमिंगोचा थवा जमला आहे. आम्ही त्याच्याही बातम्या करत आहोत. पुन्हा खूप सुंदर वातावरण अनुभवायला मिळते आहे. कित्येक वर्षानंतर या प्राण्यांना आमच्या त्रासाशिवाय फिरता यायला लागले आहे. वेगवेगळ्या बागातील लॉन हिरवेगार झाले आहे. मात्र त्यांचा जवळून आनंद घेता येत नाही. मोरांना नाचताना पाहायचे आहे, फ्लेमिंगोचा थवा पाहायचाय, कोणत्या पक्ष्याचा आवाज कसा आहे, बघायचे आहे, पण बाहेर पडता येत नाही. त्यामुळे हे पक्षी, प्राणी आम्हाला वाकुल्या दाखवतात, असे वाटू लागले आहे. जीवाची घालमेल होतेय. पुन्हा बाहेर यावेसे वाटते. पण तू कधी कोठे हल्ला करशील ही भीती बाहेर पडू देत नाही. तू खूप नुकसान केले, असे मी म्हणणार नाही. उलट तू आम्ही करत असलेल्या पर्यावरणाच्या नुकसानीची जाणीव करून दिलीस. लोकांना माझे हे म्हणणे वेडेपणाचे वाटेल. कारण आम्हाला सवय झाली आहे, सर्व गोष्टी पैशात मोजायची. त्यापुढे निसर्गाचा विचार करणे आम्ही कधीच सोडून दिलंय. नाही तर, हेच सांगण्यासाठी धडपडणारी ती ग्रेटा नावाची मुलगी ‘ॲस्पर्जर सिंड्रोम’ने आजारी आहे, असे म्हणत त्याचे भांडवल केले नसते. आम्ही इतके कोडगे झालो आहोत की माणसाच्या भावनांची सुद्धा किंमत करत नाही, म्हणूनच देशात वृद्धाश्रमांचे पीक आले आहे. तू अनेकांचे जीव घेतलेस, तरीही स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिलेस; तरीही प्रश्न आहे, आमच्या टँकरवाड्यात खरेच शुद्ध पाणी मिळत असेल?

निसर्गाने या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस दिला कारण कदाचित निसर्गाला तू येणार आणि आम्हा मानव प्राण्यांना पाण्याची जास्त गरज भासणार, हे त्याने ओळखले असावे. निसर्गावर आम्ही अनंत अन्याय, अत्याचार केले तरी तो केवळ द्यायचाच विचार करतो. निसर्ग मात्र सर्वांचे हित पाहतो. पुराने केलेले नुकसान डोळ्याआड होऊन निसर्गाने त्याच्या सर्वात मोठ्या शत्रूची, मानवाची काळजीच घेतली, असे वाटते. इटलीच्या प्रसिद्ध लेखिका फ्रांसिस्का मेलँड्री यांनी ‘फ्रॉम युअर फ्यूचर’ हे मानवाला सावध करणारे पत्र लिहिले. मात्र खरेच बदलणार आहोत का आम्ही? हा प्रश्न माझ्याही मनात आहे. केरळमध्ये भुकेने व्याकूळ गरोदर हत्तीणीच्या तोंडात अननसामध्ये पेटते फटाके देऊन जीव घेणारे मानवातील ‘दानव’ ही शंका निश्चितच रास्त ठरवतात. तरीही खूप झाले रे… आता संपव हे सगळं. मला खात्री आहे, तुला संपवणारी लसही आम्ही शोधून काढू. तुला नामशेष करण्यात शास्त्रज्ञ आणि संशोधक निश्चितच यशस्वी होतील. मात्र तोपर्यंत तुझा प्रकोप लांबवू नकोस. निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी, आमच्या पुढच्या पिढीला स्वच्छ पाणी, शुद्ध हवा मिळेल, यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. जल, जंगल आणि जमीन याचा समतोल साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. आम्ही जन्मलो तेव्हा हे जग जितके सुंदर होते, त्यापेक्षा जास्त सुंदर बनवण्यासाठी कटिबद्ध राहू. आमच्या नातवंडाना, परतवंडांनाही आजी चिऊ-काऊचा घास भरवू शकेल, यासाठी सर्व सजीवांना जगण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध राहील, याची काळजी घेऊ. निव्वळ वृक्षारोपणाचे फोटो झळकवण्यासाठी झाडे न लावता आम्ही ती जगवू… पण तू आता जा. ‘पुढच्या पिढीला जरब बसलीय’ अशी समस्त मानव जातीतर्फे नाही, पण बहुसंख्येने असणाऱ्या सामान्य जनांच्या वतीने मी तुला खात्री देतो. नाही तरी तुझे बहुतांश बळी हे सामान्य जनांचेच असतात. ही सामान्य माणसे ही ‘ॲक्टिंग’वर नाही तर ‘ॲक्शन’वर भर देत असतात. त्यांना दिखाव्यात रस नसतो. ही मंडळी निश्चितच आता निसर्गासाठी, त्याला जपण्यासाठी आधिक कृतीशील होतील.

अरे, तुझ्यामुळे बालवर्ग पुन्हा घरातील खेळाकडे वळलाय. तो आता सागरगोटे, कॅरम खेळू लागला आहे. गाण्यांच्या आणि गावांच्या नावाच्या भेंड्या खेळतोय. पण त्यांच्या सक्षम वाढीसाठी त्यांनी बाहेरही फिरायला हवं. निसर्ग अभ्यासायला हवा. त्यांचा किलबिलाट शाळामध्ये व्हायला हवा. निसर्ग माफ करतो. अगदी ‘निसर्ग’ नाव मिळालेले वादळसुद्धा किती शहाण्यासारखे वागले. त्यामुळे मोठा विनाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण त्यांने काही झाडांचा बळी घेतला. काही पक्षी मृत्यूमुखी पडले. पण त्याच्या एकूण वागण्यातून तुझ्यामुळे अगोदरच त्रस्त झालेल्या मानव प्राण्याला त्यांनी त्रास नाही दिला. ‘निसर्ग’ नावाचे वादळ असे वागत असेल, तर मग तूही निसर्गाचाच भाग आहेस ना. स्वत:ला आवर. आम्हाला घातलेले ‘लॉक’ आता तू ‘डाऊन’ कर. तुला पुन्हा येण्याची वेळ आम्ही येऊ देणार नाही… आम्ही आमच्यात सुधारणा करू… आणि नाही सुधारलो, तर निसर्गाच्या असमतोलातच आम्ही मरू, हे कळलंय आम्हाला… तेव्हा तू जा… अगदी कायमचा!
तुझाच निसर्गप्रेमी.

डॉ. व्ही.एन.शिंदे हे विज्ञान आणि पर्यावरण अभ्यासक, लेखक आहेत. या विषयांवरील त्यांचं लेखन दैनिकांत, मासिकांत आणि त्यांच्या स्वतःच्या ग्रीन रुम या ब्लॉगवर प्रकाशित झालेलं आहे.

प्रतिक्रियांसाठी संपर्क – 9673784400

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पुणे जिल्ह्यात दिवसभरात १७६ रुग्ण

पुणे । पुणे जिल्ह्यात आज दिवसभरत १७६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याबरोबरच जिल्ह्यात एकूण ७ हजार २६५ इतकी रुग्णसंख्या झाली आहे. ही माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून दिली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी मिळून इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात संचारबंदीचे नियम शिथिल केले असले तरी प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने विविध उपाय राबविले जात आहेत.

जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांपैकी नायडू महापालिका रुग्णालयात ११०, खाजगी रुग्णालयात ५३ आणि ससून मध्ये १३ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात सर्वत्र सामाजिक अलगावच्या नियमांचे पालन केले जात आहे. बाहेरून येण्यासाठी तसेच जिल्ह्यात प्रवासासाठीही पास गरजेचा करण्यात आला आहे.

 

दरम्यान आज राज्यभरात एकूण २९३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ७७ हजार ७९३ इतक्यावर पोहोचली आहे. राज्यातील एकूण मृतांची संख्या २७१० इतकी झाली आहे. आज सुधारित शिथिल केलेल्या नियमांची यादी राज्य सरकारने जाहीर केली असून त्यात सामाजिक अलगाव सर्वाना बंधनकारक असल्याचे नमूद केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.