पालघर जमाव हत्येप्रकरणी २ पोलीस अधिकारी निलंबित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या गडचिंचले येथे जमावाने ३ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणामध्ये कासा पोलीस ठाण्याच्या दोन अधिकाऱ्याना निलंबित करण्यात आले आहे. कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव काळे व पोलीस उपनिरीक्षक सुधीर काटारे यांच्यावर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून पालघर पोलीस अधीक्षक यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

लॉकडाउन असताना गुरुवारी रात्री गुजरात राज्यात आडमार्गाने प्रवेश घेऊ पाहणार्‍या मुंबई येथील ३ व्यक्तींची दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेशाच्या हद्दीजवळ गावकऱ्यांनी अमानुषपणे मारहाण करून निर्घृणपणे हत्या केली. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गडचिंचले परिसरात २ साधू व त्यांच्या वाहनचालकाला गावकऱ्यांनी अमानुषपणे मारहाण करून त्यांची हत्या केली होती. हा मुद्दा देशभर गाजला या प्रकरणांमध्ये पोलिसांनी हे प्रकरण हाताळत असताना त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आल्याचे समजते.

दरम्यान, पालघरमधील घटनेवरुन विरोधकांनी राज्य सरकावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. यावर बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पालघरमधील घटनेचं राजकारण करु नये असं आवाहन केलं आहे. अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याआधी देशमुख यांनी ट्विट करीत समाजमाध्यमांतून या प्रकरणी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलीस आणि सायबर सेलला कठोर कारवाईचे आदेश दिले असल्याची माहिती दिली होती.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”

Leave a Comment