देशमुख यांनी राजीनामा दिलाय आता मुख्यमंत्री तुम्हीही द्या : रामदास आठवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपामुळे त्यांनी आपलया पदाचा फार उशिरा राजीनामा दिला आहे. केवळ गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर राज्यातील घडामोडींची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीआहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा द्यावा,” अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सोमवारी सायंकाळी केली.

रामदास आठवले म्हणाले, “उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवण्यात सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव पुढे येणे. त्यानंतर मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे यांचे नाव आले. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी 100 कोटी रुपयांच्या हफ्ते वसुलीचा आरोप केला. हा आरोप महाराष्ट्राच्या गृहविभागालाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रतिमेवर कलंक लावणारा होता. तेव्हाच गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे.” “राज्यात बिघडलेली परिस्थिती पाहता आणि गृहमंत्र्यांवर झालेल्या आरोपांची सीबीआय चौकशी सुरू झालीय. याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा,” अशी मागणी रामदास आठवले यांनी ट्विटरद्वारे केली.

आज (5 एप्रिल) मुंबई उच्च न्यायालयाने या आरोपांची सीबीआय चौकशी लावली. त्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा द्यायला फार उशीर केला आहे. उशिरा का होईना राजीनामा दिला हे स्वागतार्ह आहे. मात्र, विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य होते हेच यातून निष्पन्न होत आहे,” असंही रामदास आठवले यांनी म्हटलं. “महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे. कोरोनाची स्थिती भयानक वाढली आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकार कमी पडले आहे. महाराष्ट्राच्या गृह विभागाची अवस्था वाईट आहे. राज्यात बिघडलेली कायदा सुव्यवस्था पाहता आम्ही या आधीही महाराष्ट्र राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे ही मागणी केली होती. ही आमची मागणी योग्य आहे.”

Leave a Comment