रेमडेसिवीरचा ‘गेम’डीसिवीर करू नका : आठवलेंनी ठाकरे सरकारला डिवचले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील ठाकरे सरकारला डिवचले आहे. रेमडेसिवीरचा गेमडेसिवीर करू नका, असा टोला रामदास आठवले यांनी आघाडी सरकारला लगावला आहे.

रामदास आठवले यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे. रेमडेसिवीरसह सर्व औषधे महाराष्ट्राला मिळतील. औषधे पुरवू नका असे कोणतेही सरकार आदेश देऊ शकत नाही. राज्य सरकार केंद्रावर खोटे आणि खोडसाळ आरोप करीत आहे. महाविकास आघाडी सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपवू शकत नाही, असं आठवले यांनी म्हटलं आहे.

कोरोनाचा कहर रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारचीसुद्धा आहे. त्यामुळे या परिस्थितीत आरोपांचे राजकारण कोणी करू नये असे आवाहनही त्यांनी केलं. कोरोनाच्या महामारीमुळे मोठया प्रमाणात मृत्यू होत आहेत त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचा खोटा आणि खोडसाळ आरोप राज्य सरकार करत आहे. देशात कोरोनाचा कहर रोखण्यासाठी मोदी चांगले काम करत आहेत. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी, राज्यपालांशी संवाद साधत आहे. महराष्ट्राच्या महाविकास आघाडीने दुतोंडी भूमिका घेऊ नये. केंद्र सरकार महाराष्ट्राला लस आणि ऑक्सिजन, रेमडेसिवरसह सर्व औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या मुद्द्यावर राजकारण करू नये आणि खोडसाळ आरोप केंद्र सरकारवर करू नये, असे आवाहनही त्यांनी केलं.

मला रोज मुंबईसह राज्यातून फोन येत आहेत. रुग्णांना बेड मिळत नसल्याचं सांगण्यात येत आहे. रुग्णांची गैरसोय होत आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांना सुविधा पुरविण्यात मुंबई मनपा आणि राज्य सरकार अपयशी ठरले आहे. मात्र राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे, असंही ते म्हणाले.

Leave a Comment