शिंदे-फडणवीस सरकारचा लवकरच राजकीय अंत होईल : संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे- फडणवीस सरकार आणि सेनेच्या बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. “ज्यांनी शिवसेना सोडलेली आहे, त्यांनी शिवसेनेचा वापर करू नये आणि स्वतःचा स्वतंत्र पक्ष तयार करावा,” असा सल्ला राऊतांनी दिला आहे. तसेच “शिंदे-फडणवीस सरकारचा लवकरच राजकीय अंत होईल, असे भाकीतही खा. राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “बंडखोर आमदार शिवसेना- शिवसेना जे करत आहेत. ते का करतायत? बाळासाहेब ठाकरे यांची ही खरी शिवसेना आहे. या शिवसेनेच्या पंखाखाली तुम्ही का जगता? तुम्ही स्वाभिमानासाठी बाहेर पडला असाल तर तुम्ही तुमचं स्वतंत्र स्थान निर्माण करा. शिवसेनेचा गैरवापर करू नका. स्वतंत्र पक्ष स्थापन करा.”

“शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले असे अनेक पहायला मिळतील कि जे शिवसेना – भाजप युती असताना पराभूत झालेले आहेत. त्यांना आता भाजपचा पुळका आला आहे. पण ज्यांनी- ज्यांनी शिवसेना सोडली ते राजकारणातून अनेक वर्ष हद्दपार झाले आहेत, हा इतिहास आहे. शिंदे गटात हा इतिहास बदलण्याची ताकद नाही,” असा टोला खा. राऊत यांनी लगावला.

‘एक दुजे के लिए’ पडद्यावर त्याचा अंत जसा झाला, तसाच…

यावेळी राऊतांनी शिंदे- फडणवीस सरकारवर मंत्रिमंडळावरुन टीका केली. ते म्हणाले की, “इतके दिवस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन मंत्रीमंडळ होऊ शकत नाही. नवीन सिनेमा राजकारणात सुरू आहे. ‘एक दुजे के लिए’ पडद्यावर त्याचा अंत जसा झाला, तसाच राजकीय अंत सुद्धा त्याच पद्धतीने होईल. शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांनी राजकीय आत्महत्या केली आहे.”

Leave a Comment