हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कडक लॉकडाऊन लागू करणे महत्वाचे आहे. त्यामुळेच राज्यात लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आता सुरु आहे.
कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला जात आहे. या बैठकीतच लॉकडाऊनचा निर्णय होण्याची शक्यता आहे. बैठकीत 15 दिवस लॉकडाऊन लावण्याची मागणी मंत्र्यांची केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सध्या राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र त्यातही लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहे. तसेच सार्वजनिक वाहतूकही अत्यावश्यक सेवेसाठी सुरु आहे.
त्यामुळे कडक निर्बंध असले तरी त्याचा परिणाम हवा तेवढा होताना दिसत नाहीये. कॅबिनेटमध्ये राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याबाबत चर्चा केली जात आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कडक लॉकडाऊन लावावे,यासाठी काही मंत्री आग्रही आहेत. वाढत्या रुग्णसंख्येत संचारबंदी लावूनही ही फरक पडला नसल्यानं कडक लॉकडाऊनची मागणी जोर धरत आहे.