नवे संसद भवन मी बांधले, ही माझी इस्टेट, मी आणि फक्त मीच! हेच मोदींचे धोरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या नव्या संसद भवनांचे उदघाटन येत्या २८ मे ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. खरं तर संसदेचे उदघाटन राष्ट्रपतींनी करावे अशी विरोधकांची मागणी आहे. यामुळे देशभरातील भाजपविरोधी पक्षांनी या उदघाटनाला विरोधही केला आहे. या एकूण सर्व प्रकरणावरून सामना अग्रलेखातून मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे. नवे संसद भवन मी बांधले, ही माझी इस्टेट, त्यामुळे उद्घाटनाच्या कोनशिलेवर फक्त माझेच नाव राहील. मी आणि फक्त मीच!” असे मोदींचे धोरण आहे. हा अहंकार लोकशाहीला घातक आहे. असं सामनातुन म्हंटल आहे.

राष्ट्रपतींचा सन्मान राखला पाहिजे. राष्ट्रपती केवळ देशाचे प्रमुख नसतात, तर संसदेचे अविभाज्य घटकही असतात. राष्ट्रपती संसदेचे अधिवेशन बोलवतात, वर्षारंभाच्या पहिल्या अधिवेशनाला मार्गदर्शन करतात. राष्ट्रपतींविना संसद कार्यरत राहू शकत नाही. राष्ट्रपती हेच संसदेचे सर्वाधिकारी असतात. पंतप्रधान मोदी यांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाचे साधे निमंत्रणही राष्ट्रपतींना दिले नाही. अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

शिवसेनेने उद्घाटन सोहळय़ावर बहिष्कार टाकला, पण श्रीमान उद्धव ठाकरे यांना बोलवतेच कोण? असे सवाल देवेंद्र फडणवीस वगैरेंनी विचारले. ही त्यांची टाळकुटी संस्कृती आहे. ज्या आडवाणींमुळे भाजपला आजचे ‘अच्छे दिन’ पाहायला मिळाले, त्यांना तरी नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळय़ाचे निमंत्रण दिले काय? की त्यांनाही गेटवरच अडवले जाणार आहे ते आधी सांगा. राष्ट्रपतींच्या अपमानाबद्दल फडणवीस यांनी बोलावे. संविधान, नैतिकतेची जी पायमल्ली चालली आहे, त्यावर बोलावे. लोकशाहीत विरोधी पक्षांच्या भूमिकेस महत्त्व नसेल तर ती लोकशाही काय चाटायची आहे? असा सवाल सामनातून करण्यात आलाय.