तीनशे एकरावरील ऊस जळून झाला खाक, शेतकऱ्याचे एक कोटीचे नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी ।  प्रथमेश परब

महापूर आणि अतिवृष्टी या संकटांनंतर दुधगाव येथील ऊसाला दुपारी साडेतीनच्या सुमारास आग लागली. त्यामध्ये सुमारे तीनशे एकरांवरील ऊस जळून खाक झाला. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतू आगीचे लोट भयानक असल्याने अपयश आले. आगीमध्ये सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले. आगीचे कारण स्पष्ट झाले नसले तरी अज्ञाताकडून आग लावण्यात आल्याची चर्चा घटनास्थळी सुरु होती. शेतकर्‍यांच्या डोळ्यादेखत ऊस जळत असताना हतबल झाल्याचे दिसून आले.

वारणा नदीकाठावर असलेल्या दुधगावमध्ये ऊसाचे मोठे क्षेत्र आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ऊसतोड हंगामाला सुरुवात झाली आहे. मात्र डिसेंबर आणि जानेवारीच्या प्रारंभीच झालेल्या अतिवृष्टीमुळे ऊसतोडीवर परिणाम झाला होता. सध्या ऊसाचा हंगाम मध्यावधीत आला आहे. फेब्रुवारीच्या पंधरवड्यातही आडसाली लागणही शेतात उभी असल्याने शेतकर्‍यांची डोकेदुखी वाढली असताना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास डिग्रज वाट, दुधगाव-कवठेपिरान रोडवरील ओढ्यापासून गणपती मंदीराजवळ कवठेपिरान हद्दीपर्यंतचा ऊसाला अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केले.

अचानक ऊसातून धूर आणि आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात जमा झाले होते, परंतू ऊस आणि ऊसाचे पाचत लवकर पेट घेत होते. आगीची दाहकता जादा असल्यामुळे आग आटोक्यात आणता आली नाही. त्यामध्ये दीड एकर परिसरातील सुमारे तीनशे एकरावरील ऊस जळून खाक झाला. त्यामध्ये अंदाजे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शेतकर्‍यांच्या डोळ्यासमोर वर्षभर सांभाळून ठेवलेला ऊस जळून खाक झाला. या भागात ऊसाचे मुख्य पीक आहे, ऊसावरच शेतकर्‍यांचे वर्षाचे आर्थिक नियोजन असते. या आगीत ऊसाचेच नाही, तर इतर शेती साहित्याचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले.

Leave a Comment