पंढरपूरहून गावी परतणाऱ्या वारकऱ्यांचा गाडीला भीषण अपघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. पंढरीच्या विठुरायाची भेट घेऊन घरी परतणाऱ्या परभणीच्या वारकऱ्यांवर काळाने घाला घातला आहे. हे वारकरी ज्या गाडीने प्रवास करत होते त्या पिकअप टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या दुर्दैवी घटनेमुळे बीड आणि पंढरपूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडले नेमके ?
पंढरपूरची चैत्र वारी करुन काही वारकरी पिकअप गाडीने परभणीच्या दिशेला रवाना झाले होते. पण बीडच्या माजलगाव तालुक्यातील नित्रुडजवळ खामगाव-पंढरपूर या दिंडी मार्गावर वारकऱ्यांची पिकअप, एक ट्रॅक्टर आणि मोरटरसायकल यांचा तिहेरी अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता कि दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले. यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. आज दुपारी चार वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात परभणीचे नारायण ताठे आणि चंद्रभान डाके या रहिवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.

तसेच श्रीपती धोंडीराम हूरसुने, पंडित शेषराव ताठे, श्रीहरी आश्रुबा उगले, साधू देवराव हेंडगे, शिवाजी भागूजी वायकर हे गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तर एक नऊ वर्षांचा मुलगा, बाबुराव जनार्दन उगले, विश्वनाथ श्रीरंग मगर, पुंजाराम महादेव राऊत, राजाराम सखाराम पिंगळकर यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. यानंतर या घटनेची माहिती दिंद्रुड पोलिसांना देण्यात आली. दिंद्रुड पोलिस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment