शिवसेनेच्या नेतृत्वात संभाजीनगरमधील पाण्याचा सत्यानाश; जलआक्रोश मोर्चातून फडणवीसांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाणीटंचाईच्या प्रश्नावरून आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्यावतीने पैठणगेट ते औरंगाबाद महापालिका कार्यालयापर्यंत मोठ्या महिलांच्या संख्येने जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी फडणवीसांनी शिवसेना व महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. “आपण मुख्यमंत्री असताना 1600 कोटी रुपये मंजूर केले होते, आता त्यातील 600 कोटी रुपये महापालिकेला द्यावे लागणार आहेत, महापालिकेकडे एकही रुपया नाही. एवढी वर्षे महानगरपालिकेत सत्ता असताना शिवसेना पाणी प्रश्न मिटवू शकली या काळात पाण्याचा सत्यानाश केला असल्याची घणाघाती टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज औरंगाबाद येथील संभाजीनगरमधील जल आक्रोश मोर्चास उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या मोर्चात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड यांच्यासह प्रमुख नेते सहभागी झाले होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने दिलेले पैसेच संभाजीनगर येथील पाणी पुरवठा योजनेत वळवले आहेत.

मात्र, योजनेचा ठेकेदार कामही करत नाही. अर्धा किलोमीटरही काम झालेले नाही. 40 किलोमीटर काम करायचे बाकी आहेत. ज्या वेगाने काम चाललेले आहे. त्या वेगाने 25 वर्ष लागतील. त्यामुळे आम्ही भाजपच्या वतीने जल आक्रोश मोर्चा काढत आहोत. या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद आहे. पाण्याची समस्या सुटेपर्यंत भाजपचा संघर्ष सुरू राहणार, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

3 हजार भाजप महिला पदाधिकारी हंडे घेऊन सहभागी

औरंगाबाद येथील संभाजीनगर या ठिकाणी आज भाजपच्यावतीने भव्य असा जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहरातील पैठणगेट येथून या मोर्च्याला सुरुवात करण्यात आली. या मोर्च्यात तीन हजार भाजप महिला पदाधिकारी हंडे घेऊन सहभागी झाल्या होत्या. मोर्चामध्ये भाजप महिला कार्यकर्त्यांनी पाण्यासाठी जोगावा मागून निषेध नोंदवला आहे.

Leave a Comment