Tuesday, June 6, 2023

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेचे विधानभवनात पडसाद; रोहित पवारांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस पार पडत आहे. या अधिवेशनात चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याच्या घटनेचा मुद्दा उपस्थित केला. बेळगाव परिसरात असलेल्या महाराष्ट्रातील युवकांच्या पाठिशी राहावे. ज्या युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांना सोडवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे, अशी महत्वाची मागणी पवार यांनी केली.

मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार रोहित पवार यांनी बेळगाव येथे घडलेल्या घटनेची आठवण करून दिली. बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या झालेल्या विटंबनेनंतर कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बेळगावमधील मराठी युवांवरील अन्यायाविरोधात ‘पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन’वर विधानसभेत पवार यांनी आवाज उठवला. यावेळी ते म्हणाले की, आज काही बेळगावमधील युवकांनी माझी भेट घेतली. १५ डिसेंबर रोजी बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची विटंबना करण्याची घटना घडली. या घटनेनंतर कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रातील मराठी युवकांना तत्काळ घरात घुसून ताब्यात घेतले. त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेल्या आंदोलकांना खोट्या गुन्ह्यात अडकवले गेले. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारने त्या युवकांच्या पाठीशीच उभे राहणे गरजेचे आहे.

बेळगाव परिसरात राहत असलेल्या युवकांच्या पाठीशी राज्य सरकारने उभे राहणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्य सरकारने कर्नाटक सरकारशी बोलून ज्या युवकांना ताब्यात घेतले आहे. त्यांना ताबडतोब सोडण्यासाठी सांगावे. नाहीतर महाराष्ट्राच्या माध्यमातुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सांगावे. असे जर झाले नाही तर महाराष्ट्राताही युवक कर्नाटकात जातील आणि अटक केलेल्या युवकांना मदत करतील, असा सूचक इशारा यावेळी पवार यांनी दिला आहे.