माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी विधानसभेत मांडला कराड-मलकापूरच्या स्वच्छ पाण्याचा प्रश्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
टेंभू योजनेच्या बंधार्‍यामुळे बॅक वॉटरची फुग कराड शहर ते वारुंजी पर्यंत असते. हे पाणी वेळच्यावेळी उपसले जात नसल्याने पाणी तिथेच अडकून राहते. तसेच कराड व मलकापूर शहराचे सांडपाणी याच ठिकाणी सोडले जाते. वारुंजी जवळील भागात मलकापूर व कराड नगरपालिका नदीतील पाणी उपसा करीत असते. पण दोन्ही शहराचे सोडलेल्या सांड पाण्यामुळे व टेंभूचे पाणी वेळच्यावेळी उपसले जात नसल्याने शहराला स्वच्छ पाणी मिळत नसल्याचा प्रश्न काल माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिवेशनात मांडला.

कराड-मलकापूरचा स्वच्छ पाण्याचा व सांडपाण्याच्या प्रश्नावर बोलताना आ. चव्हाण म्हणाले की, टेंभुच्या भूगवट्यामुळे काही वेळेला रोगराई सुद्धा पसरते, पुराच्यावेळी पाणी अत्यंत खराब येत असल्याचे दिसत असल्यामुळे वारुंजी येथे बंधार्‍याचे काम सुरू आहे ते जलद गतीने पूर्ण केले जावे. जेणेकरून कोयना नदीचे स्वच्छ पाणी नगरपालिकेकडून उचलले जाईल आणि ते पाणी दोन्ही शहरांना मिळेल.

तसेच टेंभू योजनेच्या फुगीचे पाणी वारुंजी बंधार्‍याच्या पुढे अडविले जाईल. तसेच टेंभू योजनेमध्ये अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना पूर्ण मोबदला सुद्धा अजून मिळालेला नाही तर अशा शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा, असा मागण्या आ. चव्हाण यांनी विधानसभेत केल्या.

यावेळी आ. चव्हाण यांच्या या दोन्ही मागण्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. वारुंजी येथील प्रस्तावित बांधार्‍याचे काम पूर्ण केले जाईल. ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी टेंभू योजनेत गेल्या आहेत त्यांना सुद्धा पूर्ण मोबदला देण्यासाठी शासन प्रयत्नशील असेल, असे फडणवीस यांनी म्हंटले.