भारतीय रेल्वेचे चीनला चोख उत्तर! मार्च 2023 पर्यंत पूर्ण होणार सिक्कीम रेल्वे प्रकल्प; जाणून घ्या

0
60
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताने चीनचा मुळीच विचार न करता, रेल्वेने सिक्कीमला जाणाऱ्या रेल्वे मार्गाच्या कामांना वेग दिला आहे. सर्व आव्हाने असूनही मार्च 2023 मध्ये या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे. पश्चिम बंगाल रेल लाइनच्या सेवोक ते सिक्कीममधील रांगपो पर्यंत ही रेल्वे लाइन तयार केली जात आहे. ईशान्य भारतातील सिक्कीम हे एकमेव असे राज्य आहे जिथे रेल्वे नेटवर्क अस्तित्वात नाही. 2009 मध्ये सिक्किमपर्यंत रेल्वे जागेची पायाभरणी केली गेली होती. परंतु हा रेल्वे मार्ग पर्यावरणाच्या प्रश्नांवर अडकला होता. त्यानंतर 2017 मध्ये झालेल्या डोकलाम वादानंतर या रेल्वे मार्गाची गंभीरपणे दखल घेण्यात आली आणि अलिकडच्या काळात लडाखमध्ये सातत्याने संघर्ष झाल्यानंतर ते पूर्ण करण्याचे प्रयत्न तीव्र केले गेले आहेत.

लवकरात लवकर रेल्वे लाईन पूर्ण करण्यावर भर
सध्या, राष्ट्रीय महामार्ग 10 हा सिक्किमपर्यंत पोहोचण्याचा एकमेव रस्ता आहे जो या राज्याला देशाच्या इतर भागाशी जोडतो. इथल्या रस्त्यावर अत्यधिक ताण पडल्यामुळे या परिसरात वाहतुकीची कोंडीही फार मोठी झाली आहे. नाथुला पास सिक्किमची राजधानी गंगटोकपासून अवघ्या 56 कि.मी. अंतरावर आहे. हे चीनच्या सीमेला लागून आहे, म्हणून सेवोक ते रांगपो रेल्वे मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे.

रेल्वे मार्ग 13 पूल आणि 14 बोगद्यातून जाईल
सेवोक ते रांगपो या रेल्वेमार्गाची लांबी सुमारे 45 किलोमीटर आहे. हे क्षेत्र भौगोलिकदृष्ट्या आव्हानांनी भरलेले आहे. त्यामुळे हा रेल्वे मार्ग 13 पूल आणि 14 बोगद्यातून जाईल. या मार्गावर रंगपो, रायंग, तीस्ताबाजार आणि मेली स्थानकेही बांधली जात आहेत. या रेल्वे प्रकल्पाची किंमत 8900 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. या रेल्वेमार्गाचा बहुतांश भाग बोगद्यातून जाईल व त्यामुळे या परिसरातील इको-सिस्टमचीही बचत होईल.

या रेल्वे मार्गाच्या कामात गेल्या काही महिन्यांत कोरोना व लॉकडाऊनमुळे बर्‍याच समस्या उद्भवल्या आहेत. परंतु आता त्याचे काम मोठ्या प्रमाणात गतीमान झाले आहे. येथेही रात्रंदिवस काम सुरु करण्याचा रेल्वेचे विचार आहे. हा रेल्वे मार्ग महन्दी वाइल्ड लाइफ सेंचुरीमधून जाईल. आता वन व पर्यावरण मंत्रालयाकडून NOC मिळाल्यानंतर येथे काम वेगाने सुरू झाले आहे.

ईशान्येकडील सुरक्षेसाठी हा रेल्वे प्रकल्प खूप महत्वाचा आहे
ईशान्य सीमेवरील रेल्वेच्या वरिष्ठ PRO (कंस्ट्रक्शन) च्या मते, सिक्कीमला केली जाणारी ही रेल्वे जोडणी मार्च 2023 पर्यंत पूर्ण होईल. सेवोक ते रांगपो या रेल्वेमार्गाच्या बांधकामामुळे फक्त स्थानिक नागरिकांनाच फायदा होणार नाही तर त्यामुळे येथील पर्यटनालाही चालना मिळेल. परंतु यामधून सर्वात मोठी मदत भारतीय सैन्याला होणार आहे. यामुळे त्यांची हालचाल अत्यंत वेगाने केली जाईल. याचा अर्थ सुरक्षेच्या दृष्टीने हा रेल्वे प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे.

खरं तर, हिवाळ्यामध्ये आणि विशेषत: पावसाळ्यात होणाऱ्या लँड स्लायडिंगमुळे हा परिसर पूर्णपणे बंद असतो. अशा प्रकारे रेल्वेची एक नवीन लाईन या भागाला नवीन जीवन देणार आहे. सेवोक ते रांगपो दरम्यान 100 किमी वेगाने ट्रेन धावू शकते. हा प्रवास 2 तासांपेक्षा कमी असेल. मग एका तासात रांगपो येथून गंगटोक रस्त्याने जाता येते. येत्या काळात रेल्वेही रांगपो आणि गंगटोक दरम्यान एक रेल्वे मार्ग तयार करणार आहे, ही लाईन पुढे नाथुला खिंडीत जाईल. म्हणजेच हा संपूर्ण रेल्वे प्रकल्प संरक्षण गरजांसाठीही खूप खास आहे.

सेवोक रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात स्थित एक छोटेसे स्टेशन आहे. ते न्यू जलपाईगुडी-अलीपुरद्वार-गुवाहाटी रेल्वे मार्गावर आहे. सेवोक-रांगपो रेल्वे मार्ग सिक्कीमला संपूर्ण भारतातून रेल्वे नेटवर्कशी जोडणारी लाइन असेल. हे स्टेशन न्यू जलपाईगुडीपासून 35 कि.मी. अंतरावर आहे तर सिक्कीमच्या सीमेवर रंगपो स्टेशन आहे.

लोकांना मोठा दिलासा
सध्या, सिक्कीम हे राज्य फक्त रस्त्याद्वारे जोडलेले आहे. राष्ट्रीय महामार्ग 10/31 ए येथून जातो. हा एक अत्यंत दुर्गम भाग आहे आणि पावसाळ्यात खडकांच्या घसरणीमुळे या भागातील रस्ता बर्‍याचदा बंद असतो. त्यामुळे रेल्वे मार्ग तयार झाल्याने या परिसरातील लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 45 किलोमीटरच्या या रेल्वेमार्गापैकी सुमारे 86 टक्के रेल्वे बोगद्यातून जाईल. म्हणजेच हा रेल्वे मार्ग तयार झाल्याने सिक्कीमच्या इको सिस्टमला कमीतकमी नुकसान होईल. या मार्गावरील 41 कि.मी. पेक्षा जास्त रेल्वे मार्ग हा पश्चिम बंगालमध्ये तर 4 किमीपेक्षा कमी सिक्कीममध्ये (बंगालमध्ये 41.55 किमी आणि सिक्कीममध्ये 3. 41 किमी) असेल. या मार्गावर 14 बोगदे असतील तर 13 मोठे आणि 11 छोटे पूल असतील.

दार्जिलिंग हिमालयन रेल्वेने सुमारे 100 वर्षांपूर्वी 15 मे 1915 रोजी तीस्ता व्हॅली रेल्वे मार्ग सुरू केला. नंतर सिक्कीम आणि कालिंपोंगला संपूर्ण रेल्वेने रेल्वेमार्गाने जोडण्याचे उद्दीष्ट होते. सिलीगुडी ते गिलखोलापर्यंत ही लाइन सुरू झाली पण 1950 मध्ये लँड स्लायडिंगमुळे एक लाइन पूर्णपणे उधळली गेली. त्यानंतर त्याची कधीच दुरुस्तीही झाली नाही आणि ही योजना रखडली गेली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here