बावन कुळे सोडा लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखा वरची धूळ पण उडणार नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी 2024 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यातच आता भाजपकडून शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विशेष लक्ष घालण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीत जाऊन पवारांचा गड उध्वस्त करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. बावनकुळे सोडा लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखा वरची धूळ पण उडणार नाही असं आव्हाडांनी म्हंटल.

1990 नंतर शरद पवार साहेबांचे नाव घेतल्याशिवाय आपल्याला राजकारण करता येणार नाही असे विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना उबगलं.त्यानंतर सातत्याने खोटेनाटे आरोप जे कधी सत्यात उतरले नाहीत; ते बेलगाम आणि बेफामपणे करण्यात आले. त्याचा महाराष्ट्राच्या जनतेवर कुठलाच परिणाम झाला नाही.

आजही काहीजण परत एकदा शरद पवार साहेब आणि बारामती यांच्याबद्दल बोलतायेत. गड उध्वस्त करू म्हणून वल्गना करताहेत विसर्जन करू म्हणता आहेत अर्थात ते केवळ आपण आणि आपला पक्ष चर्चेत रहावा म्हणून बारामतीचा गड जिंकून दे असं साकडं बारामतीच्या मारूतीच्या देवळात जाऊन आज कुणीतरी घातलं.

60 वर्षे प्रत्येक निवडणूकीचा फॉर्म आदरणीय शरद पवार साहेब ह्याच मारूतीच्या समोर उभे राहून नंतर दाखल करतात. आज तो मारुती देवळाच्या बाहेर येऊन हसत हसत विचारत होता. हे आत्ता आलेले ते कोण होते ? बावन कुळे सोडा लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखा वरची धूळ पण उडणार नाही उद्गारली अनेक कुळे केवळ साहेबां मुळे अस म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर पलटवार केला.