Thursday, December 18, 2025
Home Blog Page 3919

विवाहितेला जबरदस्तीने विषारी औषध पाजले, पतीसह सासू व दिरावर गुन्हा

crime

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील कालेटेक येथे विवाहितेला मारहाण करून तिला जबरदस्तीने विषारी औषध पाजल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. याप्रकरणी हिना सर्फराज शेख (वय 25 रा. कालेटेक ता. कराड) यांनी कराड ग्रामिण पोलिसात फिर्याद दिली आहे.याप्रकरणी सासू, पती, दिरावर गुन्हा नोंद झाला आहे.

याबात पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हिना शेख हिचा सन 2015 साली कालेटेक येथील सर्फराज शेख यांच्याशी विवाह झाला आहे. एक वर्षापुर्वी भांडणामुळे हिना आपल्या मुलीसह माहेरी रहायला गेल्या होत्या. 4 जुलै रोजी त्यांना पती सर्फराज यांचा फोन आला. आपण स्वतंत्र राहू असे म्हणत समजूत काढली. त्यामुळे हिना या भावासह कालेटेक येथे सासरी आल्या. हिनाला सोडून भाऊ परत सातारला गेला. दरम्यान रात्री पुन्हा सासरच्या लोकांनी हिनाशी वाद घातला. सासू व पतीने मारहाण करायला सुरूवात केली. तुला इथे रहायचे असेल तर आमच्या मनाप्रमाणे रहावे लागेल असे सांगत त्यांंनी हिनाला पकडून नाक दाबत तिला विषारी औषध पाजले असे फिर्यादीत म्हटले आहे.

हिनाला घराच्या बाहेर ढकलून देत शिवीगाळ केली. हिना हिने तत्काळ पोलीस स्टेशनला फोन करून घडला प्रकार सांगितला. कालेटेकचे पोलीस पाटील विठ्ठल जाधव यांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी शेख यांच्या घराकडे धाव घेतली. इतर नातेवाईकांच्या मदतीने रूग्णवाहिका बोलवून हिनाला खासगी रूग्णालयात दाखल केले. याप्रकरणी हिना शेखने दिलेल्या जबाबावरून सासू, पतीसह दिरावर गुन्हा दाखल झाला आहे.

आदेशाचे उल्लघंन : भिडे गुरुजींसह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या 80 धारकर्‍यांवर गुन्हा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी केलेल्या निर्देशांचे व आदेशांचे उल्लघंन केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यासह 70 ते 80 धारकर्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवार दि. 5 रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे  उल्लघंन करुन त्यांनी कराड शहरात बेकायदा जमाव जमवून रॅली काढली व मंदीर प्रवेश बंदी असतानाही मंदीर उघडून मंदीरात प्रवेश केला. याबाबतची फिर्याद पोलिस हवालदार प्रशांत पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.

भिडे गुरुजींसह सागर आमले, अजय पावस्कर, केदार डोईफोडे, प्रवीण माने, गणेश कापसे, रणजित पाटील, सुदर्शन पाटसकर यांच्यासह 70 ते 80 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे पायी दिडीं काढून जाण्यासाठी शासनाने बंदी घातली आहे. परंतु ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी शासनाच्या आदेशाचे उल्लघंन करुन आषाढी वारीसाठी जात असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले. शासनाने बंडातात्या कराडकर यांच्यासह वारकर्‍यांना वारीसाठी परवानगी द्यावी. या मागणीला समर्थन देत सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास  संभाजी भिडे गुरुजी दत्त चौक कराड येथे आले. यावेळी त्यांच्यासह शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या 70 ते 80 धारकरी बंद असलेले साईबाबा मंदीर उघडून आत बसले. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले आहे.

तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता परवागनी न घेता, जमाव जमवून मोटर सायकल रॅली काढली. यावेळी रॅलीत सहभागी धारकर्‍यांनी विना मास्क शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचा भगवा झेंडा हातात घेवून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दत्त चौक ते प्रशासकीय इमारत येथे घोषणा बाजी करत पायी चालत जात तहसिलदार यांना निवेदन दिले. यावेळीही त्यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लघंन केल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! ग्रामीण भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग पुन्हा भरणार

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. ज्या ग्रामीण भागात कोरोना हद्दपार झाला आहे अशा ठिकाणी आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारने याबद्दल आदेश जारी केला आहे. ग्रामीण भागात कोरोनाची लागण कमी झाली आहे. यामुळे अनेक गावे कोरोनमुक्त झाले आहेत. त्यामुळे या गावांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या साठी ग्रामपंचायतीला शाळेच्या अखत्यारीतील पालकांशी चर्चा करून ठराव मंजूर करावा लागणार आहे.

शाळेत टप्या टप्याने बोलवण्यात येणार आहे. कोविड संबंधी नियमांचे पालन करणे प्रत्येक विद्यार्थ्याला बंधनकारक असणार आहे. एका बाकावर एक विद्यार्थी बसवता येणार आहे. तसेच दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर ठेवावे लागणार आहे. एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी संख्या असणार आहे. सतत हात साबणाने धुणे, मास्क घालणे याचे पालन करावे लागणार आहे.

या दरम्यान कोणतीही लक्षण आढळल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात येईल आणि त्याची लगेच कोरोना चाचणी करण्यात येईल. संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था त्याच गावात करावी लागणार आहे किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था न वापरण्याची दक्षता घ्यावी, अशा सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.

टोक्यो ऑलम्पिकमध्ये ‘या’ दोन खेळाडूंना मिळणार ध्वजवाहकाचा मान

Olympics

टोक्यो : वृत्तसंस्था – कोरोनाच्या संकटामुळे 2020 मध्ये पार पडणारी टोक्यो ऑलम्पिक 2021 पर्यंत स्थगित करण्यात आली होती. मात्र आता जपान सरकार, आयोजक समिती आणि आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिती यांनी शर्तीचे प्रयत्न करून ऑलम्पिक यंदा घेण्याचा निर्धार केला आहे. त्या दृष्टीने त्यांनी तयारीसुद्धा केली आहे. तसेच भारताने देखील आपल्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंना ऑलम्पिकसाठी पाठवण्याची संपूर्ण तयारी केली आहे. यंदाच्या ऑलम्पिकच्या उद्घाटनावेळी ध्वजवाहकाचा मान दिग्गज बॉक्सिंगपटू एमसी मेरी कोम आणि भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांना देण्यात आला आहे. तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेने दिलेल्या माहितीनुसार कुस्तीपटू बजरंग पुनिया यालादेखील 8 ऑगस्ट रोजी टोक्यो ऑलम्पिकच्या समारोह सोहळ्यावेळी ध्वजवाहकाचा मान देण्यात आला आहे.

पहिल्यांदाच एक नाही दोन ध्वजवाहक
ऑलम्पिकच्या इतिहासात यंदा पहिल्यादांच भारताचे एक नाही तर दोन ध्वजवाहक असणार आहेत. नरिंदर बत्रा यांनी खेळांमध्ये लैंगिक समानता दर्शवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. 2016 च्या रिओ ऑलम्पिकमध्ये भारताचा ध्वजवाहक म्हणून एकमात्र व्यक्तिगत ऑलम्पिक सुवर्ण पदक विजेता अभिनव बिंद्रा याला मान देण्यात आला होता.

भारतासाठी ऑलम्पिक पदक मिळवणारी पहिली महिला
दिग्गज बॉक्सिंगपटू एमसी मेरी कोम ही भारतासाठी ऑलम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारी पहिली महिला ठरली आहे. मेरी कोमने 2012 साली ऑलम्पिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवले होते. 38 वर्षीय मेरीने आतापर्यंत भारताना अनेक पदके मिळवून दिली आहेत. तिचे वय लक्षात घेता ही तिची शेवटची ऑलम्पिक स्पर्धा असू शकते. यामुळे ती यंदा पदक मिळवण्यासाठी जीव तोडून मेहनत करणार हे नक्की.

वारकरी सांप्रदायाचे मुळ हिंदूच – बंडातात्या कराडकर

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी

पायी वारीला विरोध करून पोलिसांनी वारकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढत वारकरी सांप्रदायाचे ज्येष्ठ मार्गदर्शक बंडातात्या कराडकर यांना कराड तालुक्यातील करवडी येथील श्रीकृष्ण गोपालन केंद्रात स्थानबद्ध केले आहे. दरम्यान बंडातात्या कराडकर यांची श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी सोमवारी भेट घेतली. यावेळी कराडकर म्हणाले कि, “हिंदूत्वावर काम करणारे भिडे गुरूजीही आज माझ्या भेटीला आले होते. वारकरी सांप्रदायाचे मुळ हिंदूच आहे. आणि तो सर्वधर्म समाजाचाहीआहे. त्यामुळेच शिवप्रतिष्ठान या हिंदू संघटनेला वारकऱ्यांवरील अन्याय सहन झाला नाही. या भावनेतूनच भिडे गुरुजींनी आपली भेट घेतली आहे.”

भिडे गुरुजी यांनी सोमवारी कराड तालुक्यातील करवडी येथे ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांची भेट घेतली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, वारकरी व शिवप्रतिष्ठानचे धारकरी उपस्थित होते. या भेटीदरम्यान बंडातात्या कराडकर म्हणाले, प्रशासनाने देहूमध्ये राक्षसी पद्धतीने वारकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढत मला स्थानबद्ध केले आहे. हा समस्त वारकऱ्यांवर झालेला अन्याय असून तो योग्य नसल्याची समाजभावना निर्माण झाली आहे. याच भावनेतून संभाजी भिडे (गुरूजी) यांनी माझी भेट घेतली आहे. त्यामुळे ही भेट केवळ औपचारिक असून यामागे अन्य कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शासनाने पायी वारीला विरोध करून हिंदू धर्माच्या प्रथा, परंपरा व संस्कृती एकप्रकारे खंडित करण्याचा प्रयत्न केला आहे. या विरोधाला न जुमानता आम्ही पायी वारीची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी आंदोलन करीत पंढरपूरच्या दिशेने पायी चाललो असताना पोलिसांनी मला स्थानबद्ध केले. पायी वारीच्या परंपरेत खंड पडू नये, म्हणून चाललेल्या आमच्या प्रयत्नांबद्धल श्री भिडे गुरूजींनी आमच्याप्रती अभिमान व्यक्त केला. तसेच या भेटीप्रसंगी गुरुजींनी आम्हाला शिदोरी म्हणून संदेश दिला असून त्यांनी व्यक्त केलेली सहानभूतीची भावना आम्ही स्वीकारली असल्याचेही बंडातात्या कराडकर यांनी सांगितले.

हृदयद्रावक ! एकाच दिवशी मायलेकी झाल्या विधवा

Accident

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूर जिल्ह्यातील हिरापूर याठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सासऱ्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जात असताना झालेल्या अपघातात जावयाचासुद्धा मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी सासरे आणि जावयाचा मृत्यू झाल्याने मायलेकी विधवा झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञान वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

काय आहे प्रकरण
हिरापूर येथील रहिवासी असणारे किसन चिडांम यांचा शनिवारी सायंकाळी शेतावर काम करताना अचानक मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृत किसन चिडांम यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. यानंतर नातेवाईक गावातील एक पिकअप वाहन भाड्याने घेऊन किसन यांचा मृतदेह चिमूर याठिकाणी घेऊन जात होते.

या दरम्यान चिमूर कानपा महामार्गावरून जात असताना शंकरपूर याठिकाणी त्यांच्या वाहनाला एका अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये चालकासह वाहनातील सहा जण गंभीर जखमी झाले होते. यानंतर स्थानिक लोकांनी त्यांना त्वरित ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यानंतर रविवारी पहाटे चारच्या सुमारास जावई शंकर गोमा खंडाते यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यानंतर बाकी जखमी रुग्णांना रविवारी सकाळी पुढील उपचारासाठी चंद्रपूर याठिकाणी हलवण्यात आले. एकाच दिवशी सासरे आणि जावयाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सक्षणा सलगर यांना धमकी देणाऱ्यांना घरातून ओढून मारू; सातारा राष्ट्रवादी महिला आक्रमक

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना अज्ञात व्यक्तीने घरात घुसून अत्याचार करण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला. या प्रकारानंतर सातारा राष्ट्रवादी महिला चांगल्याच संतप्त झाल्या आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याने हा धमकीचा फोन केला असल्याचा आरोप युवती प्रदेश सचिव स्मिता देशमुख यांनी केला असून धमकी देणाऱ्यास घरात घुसून मारणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भाजप आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने पवार कुटुंबियांवर टीका करत होते. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी चोख शब्दांत खडेबोल सुनावल्यानंतर पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून सक्षणा सलगर यांना धमकी दिली होती. याबाबतची माहिती स्वतः सक्षणा यांनी ट्विट करून दिली.

दरम्यान सक्षणा यांना धमकीचा फोन आल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सक्षणा यांना पाठिंबा दिला. त्यांनतर सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी थेट पत्रकार परिषद घेत गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याने हा धमकीचा फोन केला असल्याचा आरोप केला असून धमकी देणाऱ्यास घरात घुसून मारणार असल्याचे म्हंटले आहे.

खेर्डा प्रकल्पात पाणी सोडण्याची जलसंपदा विभागाला निवेदनातून मागणी

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील खेर्डा प्रकल्पात जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रा. दिनेश पाटेकर यांनी नुकतीच निवेदनाद्वारे गोदावरी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. पुढे निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, बालानगरसह परीसरात जूनमध्ये शेवटच्या आठवड्यात पडलेल्या जेमतेम पावसावर शेतकऱ्यांनी कशीबशी खरीप पेरणी केली.

त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे आता कोवळी पिके माना टाकत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीची चिंता सतावत आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची देखील टंचाई भासत आहे. अशा परीस्थितीत पाण्याची खुप गरज आहे. येथून जवळच असलेल्या खेर्डा प्रकल्पातही अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पावर परीसरातील सुमारे ३० गावे अवलंबून आहेत.

दरम्यान, अशा परीस्थितीत जर या प्रकल्पात जायकवाडी धरणातून पाणी सोडले तर प्रकल्पातील जलजीवन (जलचर प्राणी) व या भागातील बुहतांश शेतकऱ्यांना शेतीसाठी तसेच परीसरातील गावाला पिण्याच्या पाण्यासाठी मोठी मदत होईल. यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिनेश पाटेकर यांनी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांच्याकडे निवेदनातून मागणी केली आहे.

रवी शास्त्री नंतर ‘हे’ 5 दिग्गज बनू शकतात टीम इंडियाचे प्रशिक्षक, त्यात परदेशी लोकांचा देखील समावेश

नवी दिल्ली । रवि शास्त्रीच्या कोचिंग मध्ये एकंदरीत कामगिरी चांगली झाली असली तरी टीम इंडियाने अद्याप आयसीसीचे जेतेपद जिंकलेले नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार्‍या टी -20 विश्वचषकानंतर शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या जागी दुसर्‍याला कोच बनवता येईल. रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाने दोन वेळा ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकली. ही टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात देखील पोहोचली. रवी शास्त्रीनंतर टीम इंडियाचा नवा कोच कोण बनू शकेल हे जाणून घेउयात.

1- राहुल द्रविड : राहुल द्रविडच्या कोचिंग मध्ये टीम इंडिया सध्या श्रीलंका दौर्‍यावर आहे. अशा परिस्थितीत, सर्वांची नजर त्याच्यावर असेल. कित्येक ज्युनिअर खेळाडू तयार करण्याचे श्रेय त्याला जाते. 2015 मध्ये राहुल द्रविडने भारत अंडर -19 टीम आणि टीम A च्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. त्याच्या कोचिंगचा परिणाम असा झाला की, भारत 2016 मध्ये अंडर -19 वर्ल्ड कपमध्ये उपविजेता आणि 2018 मध्ये विश्वचषक जिंकला होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, मयंक अग्रवाल, ईशान किशन या खेळाडूंनी राष्ट्रीय संघात स्थान मिळवले.

2- माईक हेसन : न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन सध्या आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे डायरेक्टर ऑफ ऑपरेशंस आहेत. बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आहे. त्यामुळे दोघांमध्ये चांगली मैत्रोदेखील आहे. न्यूझीलंडने हेसनच्या कोचिंग मध्ये चांगली कामगिरी केली. 2012 मध्ये तो प्रशिक्षक बनला आणि संघाने 2015 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांचा कार्यकाळ 2019 वर्ल्ड कप पर्यंत होता, परंतु त्यांनी जून 2018 मध्येच हे पद सोडले. न्यूझीलंडच्या इतिहासातील सर्वात यशस्वी प्रशिक्षकांपैकी तो एक आहे.

3- वीरेंद्र सेहवाग : वीरेंद्र सेहवागने यापूर्वीच टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज केला होता. त्यावेळी रवी शास्त्री संघाचे प्रशिक्षक झाले होते. सेहवाग त्याच्या स्पष्ट वक्तेपणामुळे ओळखला जातो. त्याला कोचिंगचा कोणताही अनुभव नाही. ही त्यांच्यासाठी नकारात्मक गोष्ट आहे. पण त्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीशी चांगले संबंध आहेत. अशा परिस्थितीत त्याला संधी मिळू शकेल.

4-टॉम मूडी : ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू टॉम मूडीकडे कोचिंगचा खूप मोठा अनुभव आहे. सध्या तो आयपीएल टीम सनरायझर्स हैदराबादचा डायरेक्टर ऑफ क्रिकेटर आहे. 2005 पासून तो विविध संघांना कोचिंग करत आहे. श्रीलंका नॅशनल टीम व्यतिरिक्त तो आयपीएल, कॅरिबियन प्रीमियर लीग, बिग बॅश लीग, पाकिस्तान सुपर लीग मधील कोचिंगशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत तेही प्रशिक्षकाच्या शर्यतीत आहेत.

5- रवी शास्त्री: रवी शास्त्री स्वत: पुन्हा प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत आहेत. त्याच्या कोचिंग मध्ये संघ आयसीसीचे जेतेपद जिंकू शकला नसला तरी या संघाने कसोटीत क्रमांक 1 चे स्थान मिळविले आहे. एकदिवसीय विश्वचषक उपांत्य फेरीपर्यंत आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचलो. टीम इंडिया टी- 20 विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरली तर त्याला पुन्हा प्रशिक्षक बनविता येईल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

साताऱ्यात अट्टल मोबाईल चोरट्याला अटक; 5 लाख रुपये किंमतीचे मोबाईल हस्तगत

सातारा : सातारा शहर परिसरात मोबाईल चोरणारा अट्टल चोराला पोलिसांनी गजाआड केले असून, त्याच्याकडून ५० मोबाईल हस्तगत केले आहेत. त्यांची एकूण किंमत 5 लाख 700 रुपये आहे. विकास अशोक खंडागळे (वय 29, रा. प्रतापसिंहनगर, खेड, ता. सातारा) असे संशयिताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, दि. 9 जानेवारी रोजी रात्री 11.30 ते दि. 10 जानेवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सातारा येथील संभाजीनगरमधील शिवराज पेट्रोल पंपाशेजारील नवीन बांधकाम साईटवर पत्र्याच्या उघड्या शेडमधून एकूण 10 हजारांचे मोबाईल चोरी गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, शहर व परिसरात वारंवार घडणाऱ्या मोबाईल चोऱ्यांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान शहर पोलिसांसमोर होते. त्यादृष्टीने शहर पोलिस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास सुरू केला. त्यानंतर शिताफीतीने चोरट्याला पकडून गुन्हा उघडकीस आणला.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपी अज्ञात असल्याने रेकॉर्डवरील गुन्हेगार पडताळणी करुनदेखील माहिती प्राप्त होत नव्हती. अशात शिवराज पेट्रोल पंपाशेजारी संभाजी नगर सातारा येथे नवीन बांधकाम सुरू असलेल्या साईटवरील चोरीस गेलेले मोबाईल हे प्रतापसिंहनगर सातारा येथील एका व्यक्तीने चोरले आहेत. अशी माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळाली. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तात्काळ प्रतापसिंहनगर येथून दि. 1 जुलै रोजी सायंकाळी संशयितास ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने शिवराज पेट्रोल पंपाशेजारी संभाजीनगर सातारा येथे बांधकामाचे ठिकाणी पत्र्याचे शेडमधून मोबाईल चोरी केल्याचे सांगितले. चोरी केलेल्या मोबाईलपैकी एक 5 हजार किंमतीचा मोबाईल फोन हस्तगत केला आहे.

पोलिसांनी आरोपीस अटक करुन तो कोठडीत असताना कसून चौकशी केली असता त्याने आणखी वेगवेगळ्या ठिकाणाहून मोबाईल चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पोहवा. गुलाब जाधव, पोलीस नाईक अविनाश चव्हाण, जोतीराम पवार, शिवाजी भिसे, पो.कॉ. गणेश घाडगे, अभय साबळे, संतोष कचरे, गणेश भोंग व विशाल धुमाळ यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे.