हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या बघता लॉकडाउन लावण्यात आला आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसायिक यासह इतर अनेक व्यवसायिकांचे नुकसान होत आहे. यावरूनच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हॉटेल रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांना मदत करण्याची मागणी केली आहे. मात्र या पत्रावरून विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. भाजपचे आमदार आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी देखील पवार यांना खरमरीत पत्र लिहून जोरदार टीका केली आहे. ‘पवार साहेब दारू वाल्यांसाठी तुम्ही कळकळीने पत्र लिहिलं मात्र महाराष्ट्रातील 150 लाख शेतकरी कुटुंब अडचणीत आहेत’ असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी शरद पवार यांना एक पत्र लिहिलं आहे. याबाबतचं ट्विट त्यांनी ट्विटर अकाउंटवर अपलोड केले आहे. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, पवार साहेब मुख्यमंत्री फक्त तुमचं ऐकतात दारू वाल्यांसाठी तुम्ही कळकळीने पत्र लिहिलं दारुवाले तुम्हाला आशीर्वाद देतील किंबहुना दारू वाल्यांच्या आशीर्वादावर तुमची मदार असेल. परंतु महाराष्ट्रातील एकशे पन्नास लाख शेतकरी कुटुंब अडचणीत आहेत शेतमजूर सुद्धा सरकार कडे आशेने पाहतात. बारा बलुतेदारांना ही जगण्यासाठी सरकारची मदतीची आवश्यकता या सर्वांत जवळ दारूवाल्यांसारखी मालमत्ता नाही. या सर्व दुखीतांच्या पीडितांच्या मदतीसाठी पवार साहेब मुख्यमंत्र्यांना पत्र लिहा ना’ असा चिमटा बोंडे यांनी या पत्रातून काढला आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी या वर्षी संकटात आहेत कोरोना मूळ कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद आहेत. धान्य, कांदा, भाजीपाला सुद्धा विकता येत नाही शेतातून माल काढूनही विकला जात नाही काही काळासाठी तरी शेतकऱ्यांना विक्री करण्याची सवलत देण्यासाठी पवार साहेब मुख्यमंत्र्यांना पत्र लिहा ना असं सांगतानाच अवकाळी ची नुकसान भरपाई अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. हेक्टरी 25 हजार रुपये मदतीची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला आणि दहा हजार रुपये हेक्टरवर बोळवण केली. अतिवृष्टीचे निकष लावून अवकाळी ने बाधित शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले. दोन महिन्यात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र मध्ये अनेक वेळा अवकाळी पाऊस आणि वादळ झाली. शेतकऱ्यांचा कांदा, आंबा यांचे अतोनात नुकसान झाले आहे परंतु सरकारने साधी दखलही घेतली नाही. या अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहा अशी मागणी त्यांनी केली आहे
मा. शरदचंद्रजी पवार साहेब शेतकरी, शेतमजुरांच्यासाठीही मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहाना….#आक्रोश_शेतकऱ्यांचा @PawarSpeaks @BJP4Maharashtra pic.twitter.com/3KoVPTxMwB
— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) May 11, 2021