रोहित पवारांनी गर्दी करणाऱ्या तळीरामांना दिला हा मोलाचा ‘सल्ला’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । केंद्र आणि राज्य सरकारने कालपासून दारू विक्रीचा निर्णय घेतल्याने मोठ्या प्रमाणावर वाईन शॉप्सच्या बाहेर तळीरामांची गर्दी दिसून आली. गेल्या दीड महिन्यापासून दारूविना तडफडत असलेल्या तळीरामांनी लांब रांगेत उभे राहून अधाशी वृत्तीने आपला दारूचा कोटा ‘फुल’ करायला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी तर या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. कोल्हापूरमध्ये तर दारू मिळवण्यावरून दोन गटात हाणामारी झाली. नाशिकमध्ये तर पोलिसांना मदिरा मंदिराबाहेर तळीरामांना लाठीचा प्रसाद वाटप करावा लागावा.

दिवसभरातील राज्यातली ही वाईट परिस्थिती बघितल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत तळीरामांना मोलाचा सल्ला दिला आहे. ‘सरकारने अनेक दुकानांना परवानगी दिली, पण विशिष्ट दुकानांपुढेच लागलेल्या रांगा पाहून वाईट वाटलं’, असं रोहित पवार म्हणाले आहेत. ‘मित्रांनो… जीवनमरणाचा प्रश्न आहे. आज घरात बसा. तुम्हाला ‘बसायचंच’ असेल तर ‘घरच्या’ परवानगीने पुढे आयुष्यभर निवांत ‘बसता’ येईल ना!’ एवढी घाई का करताय? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, तळीरामांनी दारू मिळवण्यासाठी दारूच्या दुकानांबाहेर गर्दी केल्यामुळे नाशिकमध्ये अनिश्चित काळासाठी दारूविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तर औरंगाबादमध्येही दारूची दुकानं उघडली नसल्यामुळे काही दारूवेड्या नागरिकांचा हिरमोड झाला. राज्य सरकारने घेतलेल्या दारूविक्रीच्या या निर्णयाचा सामाजिक कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे.  दारुविक्रीच्या निर्णयामुळे व्यसनाधिनता वाढेल यापासून ते घरगुती अत्याचारांत वाढ होईल, अशी मतं दारुबंदी समर्थकांनी व्यक्त केली आहेत. तर दारुसाठी उसळलेल्या गर्दीतील दर्दींनी सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment