… तर लाॅकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांना कठोर निर्णय घ्यावा लागणार – अजित पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा : राज्यातील करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. राज्यातील दहा मंत्री व २० आमदारांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यामुळं सरकारची चिंता वाढली असून संसर्ग रोखण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करायच्या याचा विचार सरकारी पातळीवर सुरू आहे. त्यामुळं पुन्हा एकदा लॉकडाउनची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज या संदर्भात महत्त्वाचं विधान केलं.

सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. ‘करोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल. या संदर्भात मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, त्याची अंमलबजावणी सर्व भागांत केली जाईल,’ असं अजित पवार म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी लॉकडाउन केलं आहे. देशातील अनेक राज्यांत रात्रीच्या वेळेस लॉकडाउन करण्यात आलं आहे. कारण, जेवताना, चहापाण्याच्या वेळेस मास्क काढतो. एकमेकांच्या समोर येतो तेव्हा करोनाचा संसर्ग झपाट्यानं होतो. त्यामुळं या गोष्टी टाळणं नितांत गरजेचं आहे,’ असं अजित पवार म्हणाले.

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपण स्वत: काळजी घेत असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. ‘माझे कार्यक्रम सुद्धा मी वेळे अगोदरच घेतो. त्यामुळं गर्दी कमी होते आणि मीच जर नियम मोडले तर बाकीच्यांना नियम काय सांगणार? पाच दिवसांच्या अधिवेशनात १० मंत्री आणि २० आमदार पाॅझिटिव्ह झाले. काही दिवस अजून अधिवेशन चालू ठेवलं असतं तर अर्ध्यापेक्षा जास्त मंत्रिमंडळ आणि आमदार करोना पाॅझिटिव्ह झाले असते, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Comment