…तर खोके कुणाकडे गेले ते एक दिवस सांगेल; शिंदे गटाच्या नेत्याचं थेट ठाकरेंना आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल बुलढाणा येथील शेतकरी संवाद मेळाव्यात भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. ठाकरेंच्या टीकेनंतर शिंदे गटातील नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. “ज्यांनी जीवन वेचलं, ज्यांनी शिवसेनेसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं त्यांची बदनामी केली जात आहे. बदनामी सहन करण्याची देखील एक मर्यादा असते. ही मर्यादा ओलांडली तर आम्ही देखील बोलू. शिवाय सततच्या बदनामीमुळे आमचा देखील संयम सुटला तर खोके कुणाकडे गेले ते एक दिवस सांगू, फ्रीजचे बॉक्स भरून कुणाकडे काय गेले हे देखील सांगू, असे आव्हान केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

दीपक केसरकर यांनी गुवाहाटी येथून थेट उद्धव ठाकरे यांना इशारा दिला. ते म्हणाले की, “आम्ही 25 जण उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडून आपण आपल्या मूळ मित्र पक्षाकडे जावू, असे म्हणालो होतो. मात्र, त्यावेळी त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे आम्ही हे पाऊल उचलले. सध्या ठाकरेंनी खोटं बोलण्याची मोहीम राबवली आहे. खोटं बोलण्यासाठी अनेक लोकांची नेमणूक केली. खोके-खोके म्हणून कोणाला हिनवता. एक दिवस या आमदारांचा संयम सुटेल आणि कायद्यामध्ये जसा माफीचा साक्षीदार हे कलम आहे. मग कळेल खोके कोणाकडे गेले ते. खोटं बोलण्याची मर्यादा ओलांडू नये अन्यथा आम्ही देखील तोंड उघडू.

ठाकरे घराण्याविषयी आम्हाला आदर आहे. त्यामुळे जास्त बोलत नाही. म्हणून त्यांनी काहीही बोलू नये. आमच्याकडे पण खूप गोष्टी आहेत. त्यांची बदनामी व्हावी अशी आमची इच्छा नाही. पण, आमची अशीच बदनामी केली तर आम्ही देखील खोके कोठे गेले हे सांगू. शेतकऱ्यांच्या हितासाठी उद्धव ठाकरे यांनी काय केलं? ते त्यांनी सांगावं, असे आव्हान केसरकर यांनी केले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

बुलढाणा येथील शेतकरी मेळाव्यात ठाकरे म्हणाले की, मुंबईनंतर माझी ही पहिलीच जाहीर सभा आहे. ज्या ठिकाणी जिजाऊंचा जन्म झाला. आज संविधान दिन आहे. मात्र, संविधान म्हंटल्यावर काय बोलायचे हा प्रश्न आहे. कारण, संविधान आज सुरक्षित आहे का? हा प्रश्न आहे. काही दिवसांपूर्वी मी आणि प्रकाश आंबेडकर एका मंचावर आलो होतो. त्यावेळी मनात प्रश्न आला लोकशाही कशी वाचवायची? काही जण 40 रेडे घेऊन तिकडे गेलेत, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा शिवतीर्थावर शपथ घेतली आणि एकविरा देवीकडे गेलो होतो. स्वतःचे आयुष्य माहीत नाही ते भवितव्य काय ठरवणार? आज नवस फेडायला आणि गेल्या आठवड्यात हात दाखवायला गेले होते.